लाठीचार्जचे आदेश देणारा माईचा लाल कोण ?
लाठीचार्जचे आदेश देणारा माईचा लाल कोण ?
नागपूर, दि. १६ डिसेंबर :-
जालना जिल्ह्य़ात मराठा आरक्षणाचे आंदोलन शांतपणे सुरू होते. कोण माईचा लाल आहे ज्याने जरांगे पाटील यांच्या शांततापूर्ण सुरू असलेल्या आंदोलनावर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी विचारला.
जयंत पाटील पुढे म्हणाले की, लाठीचार्जचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले, तहसीलदारांनी की मंत्रालयातून फोन गेला? नेमके काय झाले याची चौकशी झालीच पाहिजे आणि गोष्टी समोर आल्याच पाहिजेत. लोकप्रतिनिधींच्या घरावर हल्ले होत असताना पोलिसांचे हात कोणी बांधले होते? डीएसपीने ॲक्शन का घेतली नाही याची देखील चौकशी झाली पाहिजे. सत्य बाहेर आले पाहिजे, काळ सोकावता कामा नये असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
सभागृहात सरकारमधील मंत्रीच म्हणतात की ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. राज्याचे मंत्री स्वतः जर ओबीसींवर अन्याय होत असल्याचे भाषण करत असतील तर नक्कीच हे सरकारचं अपयश आहे. एका दशकापूर्वी मोदी साहेबांनी धनगरांना आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, ते अद्याप पूर्ण झालेले नाही. फडणीस साहेबांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो असे सांगितले होते तेही पूर्ण झाले नाही. आमची मागणी आहे कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हेही आरक्षण द्यावे त्यांनी सांगितले
राज्यात जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. ते अद्याप त्या पत्राचे उत्तर मला मिळाले नाही. राज्यात जातिनिहाय जनगणना व्हावी अशी आमची मागणी आहे. राज्यात जातिनिहाय जनगणना झाली तर आरक्षणाबाबतचे बरेचसे प्रश्न सुटतील असा मुद्दा त्यांनी मांडला.
