मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचा आरोप.
मुंबई, दि. 5 सप्टेंबर :
कंगणा आणि शिवसेना यांच्यात जे धुमशान सूरू आहे यामागे वेगळेच राजकारण असल्याची शंका मनसेने उपस्थित केली आहे. मागील दोन महिन्यांपासून एक संपादक शिवसेनेवर गंभीर आरोप करत आहे. थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देत असताना शिवसेना गप्प आहे आणि जिच्या बोलण्याला पाच पैशाची किंमत नाही, तिच्या जाळ्यात शिवसेना का अडकतेय ? शिवसेना इतकी निर्बुद्ध आहे का? असे सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केले आहेत.
कंगणाने मुंबई पोलिसांचा अपमान केेेेला, मुंबईची PoK शी तुलना केली, यावरून शिवसेनेेेने आक्रमक होत कंंगणाला सुनावले. तिच्या फोटोला जोडे मारण्याचे आंदोलन केले, थोबाड फोडण्याची भाषा केली. हे सगळे जाणीवपूर्वक घडवले जात असल्याचा आरोप मनसेचे संदीप देशपांडे यांनी केला आहे.
संदिप देशपांडे म्हणतात, ‘करोनामुळं राज्यात भयंकर परिस्थिती आहे. लाखो लोक बेरोजगार आहेत. आरोग्य व्यवस्था कोलमडल्याने हजारो लोकांचे बळी जात आहेत. मंदिरात प्रवेशाला बंदी आहे. मुख्यमंत्री घरात बसून काम करत असल्यामुळे जनतेत नाराजी आहे. रेल्वेसेवा सुरू नसल्याने लोकांच्या प्रवासाचे हाल होताहेत. या सगळ्या परिस्थितीवरून लक्ष हटविण्यासाठी, ज्या व्यक्तीच्या वक्तव्याला पाच पैशांची किंमत नाही, तिला किंमत दिली जातेय.’
कंगणा ही प्रसिद्धीसाठी वक्तव्य करणारी व्यक्ती आहे. तिने फेकलेल्या जाळ्यात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नक्कीच नाही. पण मुद्दाम शिवसेना जाळ्यात अडकतेय का? लोकांना होणाऱ्या त्रासापासून सर्वांचं लक्ष हटावं, यासाठी हे सर्व सुरू असल्याचे देशपांडे म्हणाले. या षडयंत्रामागे कोण आहे याचाही विचार झाला पाहिजे,’ असेही देशपांडे म्हणाले.