भुजबळांनी कॅबिनेटच्या बैठकीत मागण्या मांडाव्यात..
मुंबई दि.२९ नोव्हेंबर;
सर्वच आरक्षणांबाबत महाराष्ट्र आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड आमच्या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही, जिथे महाराष्ट्रात धनगरांना आरक्षण द्या म्हणतात आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड नाही म्हणतात. त्यामुळे या खोके सरकारवर आमचा विश्वास नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांवर केली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत नेमण्यात आलेली शिंदे समिती बरखास्त करावी याबाबत सुप्रिया सुळे यांचे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या, भुजबळ हे वयाने आणि मानाने मोठे आहेत. त्यांनी व्यासपीठावरुन त्यांच्या मागण्या न सांगता त्यांच्या मागण्या कॅबिनेटच्या बैठकीत मांडाव्यात, वा कमराबंद चर्चेत सांगाव्यात तो त्यांचा अधिकार आहे. भाजपचे १०८ आमदार आहेत. त्यापैकी कोणी बोलत नाही. त्यातील आठच आमदारांना मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे बाकीचे आमदार कॅबिनेटमध्ये बसत नाहीत.
महाराष्ट्रातील गलिच्छ राजकारणामध्ये हा जो गोंधळ सुरु आहे याच राजकारणामध्ये भुजबळ यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे भुजबळ यांनी त्यांचे प्रश्न कॅबिनेटमध्ये मांडावेत. खोके सरकारने महाराष्ट्राचे राजकारण दूषित केले आहे. २०० आमदार असताना तुमच्या कॅबिनेट मंत्र्याला बाहेरचे व्यासपीठ कशाला लागते? जी चर्चा कॅबिनेटमध्ये झाली आहे, ती चर्चा यांचे मंत्री बाहेर येवून बोलतात. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. याचाच अर्थ असा की, या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये समन्वय नाही. एखादी खासगी बाब आपण बाहेर उघड करुन दाखवत नाही. ही खूपच चिंताजनक बाब आहे. जर मंत्री बाहेरील व्यासपीठावरुन मागण्या करत असतील तर कॅबिनेटमध्ये कसली चर्चा होते? असा सवालही खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
सुप्रियाताई सुळे पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्रामध्ये काम करीत असलेल्या खोके सरकारला अधिकार आहेत. मात्र त्याबाबत ठामपणे मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करायला हवी. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आम्ही पूर्ण ताकदीने त्यावर बोलू. परंतू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाच्या ज्या-ज्या मागण्या आहेत, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, यात शंकाच नाही. महाराष्ट्र आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड आमच्या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही, जिथे महाराष्ट्रात धनगरांना आरक्षण द्या म्हणतात आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड नाही म्हणतात. त्यामुळे या खोके सरकारवर आमचा विश्वास नाही. कॅबिनेट मंत्र्यांमध्ये भांडणे चालली आहेत. महाराष्ट्रात दुष्काळमहागाई, बेरोजगारी, अवकाळी सारखे प्रश्न उभे आहेत. मात्र या मंत्र्यांची भांडणे संपतील, तेव्हाच महाराष्ट्राचे प्रश्न सोडवले जातील ना, असाही टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.