फक्त शिंदेच मराठा आरक्षण देऊ शकतात ..
फक्त शिंदेच मराठा आरक्षण देऊ शकतात ..
मुंबई, दि. ३ नोव्हेंबर :
महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात आणि त्यासाठी ते प्रामाणिकपणे सकारात्मक काम करत आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
उदय सामंत पुढे म्हणाले की, आमचे सरकार मराठा समाजाला कायम स्वरुपी टिकणारे आरक्षण देणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याची गरज भासणार नाही, असा आम्ही त्यांना ठाम विश्वास दिला. मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे. या दोन महिन्यात सरकार अधिक मनुष्यबळ वापरून अधिक वेगाने काम करणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की मराठा समाजातील तरुणांवरील आंदोलनाच्या केसेस मागे घाव्यात तर त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिलेल्या आहेत पहिल्या आंदोलनाच्या केसेस येत्या १५ दिवसात मागे घेतल्या जातील आणि बाकीच्या महिन्याभरात सर्व केसेस मागे घेतले जातील. मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्यांना भरपाई द्यावी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४४१ शेतकऱ्यांना संपूर्ण भरपाई देण्यात येणार, असे सांगितलेले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने लेखी स्वरूपात नोंदी करून तसे काम सुरू केलेले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले म्हणून अनेक लोकांचे वाईट मनसुबे उधळून गेले. मराठा समाजाने 2014 ते 2019 मध्ये लाखोंच्या संख्येने शांतपणे महाराष्ट्रात मोर्चे काढले, कधीच हिंसाचार केला नाही परंतु यावेळेस काही लोकांनी समाजकंटकांना घेऊन हिंसाचार घडवून सरकारला आणि मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आवाहन केले होते की शांत रहा जाळपोळ आणि तोडफोड करू नका तरी सुध्दा काही ठिकाणी अनुचित प्रकार घडले.
काही लोक नेहमी बोलत होते आम्ही मराठा समाजासोबत आहोत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळाले पाहिजे तेच लोक सहकुटुंब फिरायला गेले. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होते, महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन आणि उपोषण सुरू होते तरी ही हेच लोक सह परिवार आम्ही ज्या विमानतळावर उतरलो त्याच विमानतळावरून फिरवायला गेले होते, असा टोला उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना मारला.
