अजितदादा गटाचे अनेक जण संपर्कात.
अजितदादा गटाचे अनेक जण संपर्कात…
मुंबई, दि. १९ ऑक्टोबर;
राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या आमदारांपैकी अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. त्या आमदारांची पुन्हा राष्ट्रवादीत येण्याची इच्छा आहे पण याबाबतचा अंतिम निर्णय शरद पवार घेतील, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. पक्ष आणि चिन्ह या संदर्भात अजित पवार गटात गोंधळ आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे गेल्या अनेक वर्षांपासून ज्या मतदारसंघात निवडणूक लढत आहे. तसेच ज्या मतदारसंघांमध्ये निवडून आलेले आहे. त्या मतदारसंघाचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय आढावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे. कोल्हापूर, जळगाव, पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्य़ात लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अत्यंत चांगली परिस्थिती आहे. सर्व मतदारसंघातून सर्व कार्यकर्त्यांकडून वेगवेगळी नावे सुचवली जात आहेत. अनेक जण इच्छुक आहे. त्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही मात्र या संदर्भात चर्चा करून निर्णय घेतले जाईल.
महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवणार आहोत. अनेक पक्ष महाविकास आघाडीत येऊ इच्छितात. आम्ही सर्वांना एकत्र घेऊन चर्चा करू आणि जागा वाटपाचा निर्णय घेऊ असे जयंत पाटील म्हणाले.
