मराठा आरक्षणावरून फडणवीसच टार्गेट का ?
मुंबई, दि १४ ऑक्टोबर ;
आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. या सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वक्तव्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका विशिष्ट समाजाचे असल्यानेच त्यांना टार्गेट केले जात आहे, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे.
दरेकर म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम देवेंद्र फडणवीसांनी केले हे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला माहित आहे. केवळ आरक्षण देऊन थांबले नाही तर ते आरक्षण हायकोर्टात टिकले सुप्रीम कोर्टात ते चॅलेंज होऊ शकले नाही. दुर्दैवाने अडीच वर्षानंतर आलेल्या सरकारचे त्याठिकाणी दुर्लक्ष झाले. जरांगे यांची टीका पाहिली तर नारायण राणे त्या समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी सकारात्मक रिपोर्ट दिला. प्रामाणिकपणे आरक्षण दिले गेले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण ज्ञात आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या कुठल्याही कृतीवर संशय होऊ शकत नाही. पदभरती होती तो धाडसी निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे राणे, फडणवीस, शिंदे असतील ते सगळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने असतानाही टार्गेट देवेंद्र फडणवीस यांना केले जातेय. यामध्ये निश्चितच राजकीय वास येतोय. याचा बोलवता धनी कोण आहे का? अशा शंकेला जागा उरतेय.
दरेकर पुढे म्हणाले की, हे सरकार मराठा आरक्षण बाजूने आहे. आम्ही मराठा आरक्षणाविरोधी भुमिका घेतलेली नाही. परंतु राजकीय उद्देशाने टार्गेट करण्याचे कामं सुरू आहे. मराठा समाजाने गर्दी पहिल्यांदा पाहिली नाही. मराठा समाज कुठल्या नेत्याला पाहून गर्दी करत नाही. लाखोंचे मोर्चे झाले कुठलाही नेता नव्हता. कुणीही मराठा समाजाला भडकवू शकत नाही. त्या मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाज गर्दी असतानाही शांततेत मोर्चा काढू शकतो हा आदर्श जगासमोर मराठा समाजाने घालून दिला आहे. त्यामुळे मराठा समाज शिक्षित, समंज्यस आहे. त्याला भडकविण्याचे कामं कुणी करू शकत नाही.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाणीवपूर्वक ते एका विशिष्ट समाजाचे असल्यामुळे टीका होतेय असा माझा आरोप आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुणरत्न सदावर्ते यांचा काहीही संबंध नाही हे जगाला ठाऊक आहे. परंतु शरद पवार गटाकडून सातत्याने अशा प्रकारचा प्रकार केला जातोय व तीच भाषा जरांगे यांच्या तोंडून येत असेल तर ते कुणाच्यातरी सांगण्यावरून बोलत आहेत. केवळ हे सरकार आरक्षण विरोधी आहे, निर्दयी आहे, सरकार काहीच करु शकत नाही अशा प्रकारचा राजकीय अजेंडा सेट करण्याचा वास जेव्हा येतो तेव्हा त्यामागे बोलवता धनी आहे का? हे पाहावे लागेल. मराठा समाजाने एक व्हावे, एक राहावे ही सर्वांचीच भुमिका असल्याचेही दरेकर म्हणाले.
Leave a Comment