उद्धव ठाकरे भाजपाशी पुन्हा युती करणार होते..
उद्धव ठाकरे भाजपाशी पुन्हा युती करणार होते..
मुंबई, दि. १२ ऑक्टोबर –
उध्दव ठाकरे, अजित पवार आणि कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली होती. मोदींच्या भेटीनंतर उध्दव ठाकरे यांचे मन विचलित झाले आणि पुन्हा भाजपबरोबर सरकार स्थापन करावे असे मनात येत आहे. एकनाथ शिंदे यांनाही संजय राऊत यांनी बोलायला लावले, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी माझ्याकडे अजित पवारांची भेट घालून द्यावी असा आग्रह धरला होता. पुन्हा दोन दिवसाने आम्ही बसलो त्यावेळी आजचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर हेही उपस्थित होते. ‘भाजपबरोबर जाणे आवश्यक आहे’ हे शब्द तास – दीड तास तेच बोलत होते. ही सांगण्याची वेळ आली आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.
तुमच्यापासून फारकत घेऊन दुसरीकडे गेले ते आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यावर न्यायालयीन लढाई सुरू आहे तरीसुद्धा तुम्ही टिकाटिप्पणी करता. आम्ही घेतलेल्या भूमिकेवरसुध्दा टिकाटिप्पणी करण्याचा पत्रकार म्हणून तुम्हाला अधिकार आहे पण लिखाणात सुसंस्कृतपणा असावा, कालपर्यंत अजितदादांसारखे नेतृत्व असू शकत नाही असे म्हणणार्या संजय राऊतांनी शंभर दिवस झाल्यानंतर अशा प्रकारची टिका टिप्पणी करणे योग्य नाही. टिका टिप्पणी जरुर करा पण तुम्ही सिंचन घोटाळ्यातील आरोपी असा आमचा उल्लेख करता मात्र कुठल्याही तपास यंत्रणांच्या तपासात अजित पवार किंवा मला आरोपी केले गेले नाही उलट संजय राऊत आरोपी आहेत, आरोपी म्हणून आत गेलात व जामीनावर बाहेर आलात त्यामुळे आमच्यावर बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही असेही सुनिल तटकरेंनी सांगितले.
सामना अग्रलेखात संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याबद्दल जी गरळ ओकली त्यावर सुनिल तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षातंर्गत काय शब्दप्रयोग करावेत किंवा करु नयेत याबद्दल मला बोलायचे नाही परंतु आमच्या पक्षाच्या किंवा अजित पवार यांच्याबद्दल टिका करताना संस्कृती ठेवून करावी असेही सुनिल तटकरे म्हणाले.
