पत्रकारांबद्दल जे बोललो त्यात गैर काय ?
नाशिक, दि. २५ सप्टेंबर :
पत्रकारांना धाब्यावर घेऊन जा, चहा पाजा, भाजपा विरोधात एकही बातमी येणार नाही याची काळजी घ्या असे वादग्रस्त विधान करणारे बावनकुळे आपल्या विधानावर ठाम आहेत. नेहमीप्रमाणे “माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे, कोणत्याही गोष्टीचा निगेटिव अर्थ काढणे, चुकीचेच” असेही ते आवर्जून म्हणाले.
बावनकुळे पुढे म्हणतात की ,भाजपाचे कार्यकर्ते बुथ स्तरावर चांगले काम करीत आहेत त्यांच्या कामाची प्रसिद्धी व्हावी यासाठी प्रयत्न करायलाच हवा. अनेकदा असे होते की घटना घडलीच नाही, अपूर्ण माहितीवर बातमी येते. बातम्या देण्याचा अधिकार पत्रकारांचा आहेच, मात्र चुकीच्या बातम्या येऊ नये, याची काळजी घेण्यासाठी आपण पत्रकारांशी चांगले संबंध ठेवले पाहिजे या संदर्भाने मी बोललो होतो आणि त्यात गैर काही नाही.
नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, नागपूरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. फडणवीस यांनी केलेल्या पाहणीच्या व्हिडीओचा विपर्यास करण्यात आला आहे,. माध्यमातून बातम्या चालवण्यासाठी काही लोक चुकीचं नॅरेटिव्ह सेट करण्याचे काम करतात. नागपूरमध्ये अतिवृष्टीनंतर माझ्यासह सर्व भाजपा कार्यकर्ते फिल्डवर होते. सायंकाळी गडकरी आणि फडणवीस यांनी आढावा घेतला, तर फडणवीस यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांच्या दौऱ्यात एका घराची त्यांनी तब्बल पंधरा मिनिटे तपासणी केली. दोन्ही नेत्यांनी केलेल्या विकासकामांमुळे मागील दहा वर्षांत नागपूर बदलले आहे. त्यामुळे जनतेच्या मनात दोन्ही नेत्याबद्दल आदर आहे. ज्यांनी विकासासाठी एकही रुपया खर्च केला नाही, त्यांनी चुकीची व निगेटिव्ह माहिती पसरवू नये.