‘त्या’ कार्यक्रमाचे आयोजन करणारा कोण शहाणा आहे ?
‘त्या’ कार्यक्रमाचे आयोजन करणारा कोण शहाणा आहे ?
मुंबई, दि. २१ जुलै :-
खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळे मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांचा मुद्दा आज विधानसभेत प्रचंड गाजला. या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. आयोजन करणारा कोण शहाणा आहे ? त्याला दोषी ठरवा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.
प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान बोलताना जयंत पाटील म्हणाले की, या प्रकरणात जी समिती नेमली गेली त्या समितीला तीन महिने झाले तरी अद्याप उत्तर दाखल करता आले नाही त्यामुळे समितीला आणखी एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. हा काही इतका जटिल प्रश्न नाही. निष्पाप श्री सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. समितीला यात काय आयोजन होते, कोणी आयोजन केले होते याची चौकशी करायची आहे. भर उन्हात साडे सहाशे एकरमध्ये २० लाख लोकांना बोलवणारा, त्यांची कोणतीही सोय करणारा, हा कोण शहाणा आहे की ज्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले. याची चौकशी झाली पाहिजे. ज्यानी हा कार्यक्रम घेतला त्या शहाण्या व्यक्तीला यात दोषी ठरवले पाहिजे. हा प्रश्न राखून ठवण्याची मागणी करत असताना या समितीला मुदतवाढ न देता १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश द्या आणि हे अधिवेशन संपण्याआधी सभागृहात याबाबत गृहमंत्र्यांनी याबाबत उत्तर द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
