शेतकरीविरोधी ट्रिपल इंजिन सरकार :
शेतकरीविरोधी ट्रिपल इंजिन सरकार :
मुंबई, दि. १७ जुलै २०२३
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी भाजपाप्रणित शिंदे सरकारला घेरले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव आणला होता पण सरकारने शेतकऱी प्रश्नांवर बोलू दिले नाही. बोगस बियाणामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे पण सरकार फक्त कडक कायदा करु म्हणत वेळ मारुन नेत आहे. राज्यातील भाजपाप्रणित तिघाडी सरकार शेतकरी विरोधी असून शेतकऱ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरकार आहे, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार विरोधकांना बोलू दिले नाही, आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही असे सांगत आहेत. बोगस बियाणामुळे कापसाचे पीकच आले नाही, पिक वाया गेले व वर्षही वाया गेले. मागील वर्षाचा कापूस अजूनही शेतकऱ्याच्या घरात पडून आहे पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही. राज्यातील तिघाडी सरकार शेतकरी विरोधी आहे, शेतकरी व जनतेला लुटण्याचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा सरकारने केली पण अजून मदत मिळालेली नाही.
जनतेच्या प्रश्नावर सरकारने उत्तर दिले पाहिजे पण बहुमताच्या जोरावर राज्य सरकार उत्तर देण्यापासून पळ काढत आहे. जनतेने काँग्रेसवर विरोधी पक्षाची जबाबदारी सोपवली असून काँग्रेस पक्ष विरोध पक्षाची जबाबदीर योग्यरितीने पार पाडत सरकारला जाब विचारत राहिल, सभागृहात बोलू दिले नाही तर रस्त्यावर संघर्ष करु.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सकाळी विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. सभागृहाच्या पायऱ्यावर बसून काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारच्या आमदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
