भाजपाच्या नेतृत्वाखाली भारत जगाची महासत्ता बनेल !
भाजपाच्या नेतृत्वाखाली भारत जगाची महासत्ता बनेल !
लातूर, दि. ७ जुलै :
‘मोदी@९’ महाजनसंपर्क अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर-चाकूर विधानसभा क्षेत्रात ‘लाभार्थी मेळावा’ पार पडला. या मेळाव्याचे उदघाटन अभियानाचे मुख्य संयोजक, भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते पार पाडले. यावेळी दरेकर यांनी म्हटले की, देशाचे वातावरण बदलतेय. येणाऱ्या काळात भाजपाच्या नेतृत्वाखाली आपला देश जगातील महासत्ता असेल, लातूर जिल्ह्यातही भाजपाची महासत्ता असेल असे प्रतिपादन केले.
यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, आज आपले नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. या जगात लोकप्रिय नेता कोण असेल तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत हे संपूर्ण जग बोलत आहे. आपला स्वाभिमान, अभिमान जगात टिकवणारा नेता आज देशाचा पंतप्रधान आहे. राजकारण तर होत राहते. आमदार, खासदार तर होत राहतील. अनेक आमदार, खासदार नंतर माजी होतात. आज एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने निर्धार केला आहे देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हवेत. पूर्वी आमचे विरोधक असलेले अजित पवार असतील त्यांनीही सांगितले देशाला नेतृत्व पंतप्रधान मोदींचे हवेय. कुठल्याही पक्षातील नेत्याला, खासदाराला, आमदाराला पुन्हा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच झाले पाहिजेत असे वाटते. याचा उल्लेखही अजित पवार यांनी केला होता. त्यांनी सांगितलेले की बैठकीत शरद पवार म्हणाले होते या देशात पुन्हा मोदीच निवडून येणार आहेत. मोदींना देश समर्थन देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष असो त्यांना वाटते मोदींच्या पाठी उभे राहिले पाहिजे. म्हणून देशाचे वातावरण बदलतेय. या राज्यातील जनतेनेही ठरवले आहे पुन्हा देशाला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच हवेत, असे दरेकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, राज्यात व देशात असा एकही माणूस नाही जो केंद्र व राज्य सरकारचा लाभार्थी नाही. यावेळी दरेकर यांनी केंद्राच्या आणि राज्य सरकारने जनतेसाठी राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच सेवा, सुशासन व गरिबांचे कल्याण हे या अभियानाचे शीर्षक आहे. पूर्वी काँग्रेसचे कार्यकर्ते तर दलाल म्हणून फिरायचे. एखादी योजना दिल्लीतून आली तर त्या योजनेचा लाभ गरिबांना द्यायचा असेल तर मध्ये एजंट असायचा. आता थेट पैसे गरिबांच्या खात्यात येत आहेत. हे कामं पंतप्रधान मोदींनी केले आहे. भ्रष्टाचार मुक्त शासन देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. येणाऱ्या काही वर्षात आपला देश भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जगातील महासत्ता असेल. लातूर जिल्ह्यातही महासत्ता भाजपाची असेल असेही दरेकर म्हणाले.
आतापर्यंत महासत्ता झाल्या पण कुठल्या सर्वसामान्य माणसाचे भले झाले. कारखाना काढला तर मूठभर लोकांचे भले होते. ठराविक लोकच मोठे होणार. माझा शेतकरी मात्र कधी श्रीमंत झाला नाही. या सत्ता केवळ मूठभर लोकांसाठी राबविल्या गेल्या. परंतु आपले सरकार, मोदींचे सरकार गरिबांचे कल्याण करणारे सरकार आहे. गेल्या ९ वर्षात पंतप्रधान मोदींनी जीवाचे रान करून रात्रं दिवस कामं करून आपल्या देशातील गरिबांचे कल्याण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून धनगर, वंजारी, मातंग आणि उपेक्षित समाजासाठी मोठ्या प्रमाणावर बजेट दिले. हजारो कोटींची तरतूद उपेक्षित माणसासाठी केली. अनेक योजना मोदी-फडणवीस यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात आल्या. त्यामुळे हे गरिबांचे काळजी करणारे सरकार आहे, असा पुनःरूच्चारही दरेकर यांनी यावेळी केला.
‘मोदी@९’ महाजनसंपर्क अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर-चाकूर विधानसभा क्षेत्रात आज ‘लाभार्थी मेळावा’ पार पडला. या मेळाव्याचे उदघाटन या अभियानाचे मुख्य संयोजक आणि भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या मेळाव्याला लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. याप्रसंगी भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार रमेशआप्पा कराड, खासदार सुधाकर शृंगारे, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे, माजी आमदार सुधाकर भालेराव, महिला जिल्हा अध्यक्षा भाग्यश्री क्षीरसागर, चाकूर भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजी बैनगिरे, अहमदपूर भाजपा तालुकाध्यक्ष हणमंत देवक्तते, माजी उपसभापती सज्जनकुमार लोनाले यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
