मीरा भाईंदरच्या कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.
मीरा भाईंदरच्या कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.
ठाणे, दि. ३ जुलै :
मीरा भाईंदर हे शहर मुंबई व ठाणे शहराच्या बरोबरीने पुढे यायला हवे. यासाठी येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. या शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधी देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
भाईंदर ते दहिसर लिंक रोडचे काम हाती घेणार आहे, त्यामुळे येथील नागरिकांचा टोलचा प्रश्न मिटेल. तसेच मुंबई सागरी किनारा मार्गही विरार ते थेट पालघर पर्यंत नेण्यात येणार आहे. तसेच बांद्रा – वर्सोवा आता विरार पर्यंत आणणार आहे. तसेच मेट्रोच्या जाळ्यामुळे वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.
मिरारोड (पू.) येथील आरक्षण क्र. २४८ येथील सद्गुरू सदानंद महाराज सभागृह व कै. हरिचंद्र आमगांवकर जिमनॅस्टीक सेंटर या इमारतीचे भूमिपूजन,
केंद्र शासनाच्या हवेची गुणवत्ता सुधारणा निधी मधुन प्राप्त विविध कामांचे लोकार्पण, आमदार निधीतील आरोग्य तपासणी व्हॅनचे लोकार्पण, मिरा भाईंदर शहरातील महानगरपालिकेच्या निधीतील व शासनाच्या निधीतील सिमेंट क्राँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन, मिरा भाईंदर महानगरपालिकेची सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर आधारित वाढीव मुख्य जलवाहिन्या व वितरण व्यवस्था भूमिपूजन, मिरा भाईंदर महानगरपालिकेची भुयारी गटार योजना अशा योजनांचे भूमिपूजन पाल पडले.
राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा आता पाच लाख केली असून राज्यातील साडेबारा कोटी जनतेला त्याचा लाभ देण्यात येणार आहे. मुलींसाठी लेक लाडकी लखपती योजनेतून मुलींच्या बँक खात्यात निधी देण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात यासह अनेक निर्णय हे सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
