हिम्मत असेल तर खारघर घटनेची न्यायालयीन चौकशी करा.
हिम्मत असेल तर खारघर घटनेची न्यायालयीन चौकशी करा…
मुंबई, दि. २५ एप्रिल ;
खारघर घटनेवर शिंदे सरकार सत्य लपवत आहे. सरकार कडून मृतांचा आकडाही जाहीर केला जात नाही. या सरकारला जनाचा नाही मनाची जर असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आम्ही मागणी केली होती पण सरकारने एका आयएएस अधिकाऱ्याची चौकशी समिती नेमली आहे, हा केवळ धुळफेक करण्याचा प्रकार असून सरकारमध्ये हिम्मत असेल तर उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधिशांकडून खारघर घटनेची चौकशी करा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
पटोले पुढे म्हणाले की, हा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता सुरु होणार होता पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उशिरा आल्याने तो ११.३० वाजता सुरु झाला. रणरणत्या उन्हात लाखो लोक बसले होते. या कार्यक्रमावर सरकारच्या तिजोरीतून १३.८० कोटी रुपये खर्च करूनही लोकांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती आणि त्याचवेळी नेते व मंत्र्यांसाठी आलीशान वातानुकुलीत व्यासपीठ तयार केले होते. लाखो लोक पाण्यासाठी तडफडत असताना हे मंत्री, संत्री शाही भोजन झोडत होते, त्याचे फोटोही प्रसार माध्यमात प्रसिद्ध झाले आहेत.
खारघरमध्ये कार्यक्रम सुरु असताना पहिला मृत्यू १२ वाजता झाला तरिही कार्यक्रम सुरुच ठेवला. एवढा मोठा प्रकार घडूनही सरकारचे मंत्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीच वेळ दिली होती असा आरोप करुन त्यांना दोषी ठरवत आहेत.
खारघर घटनेने महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावयास लावली परंतु राज्यातील सरकार मात्र त्याकडे फारसे गांभिर्याने पहात नाही. या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणून सत्य परिस्थिती काय आहे हे जनतेला कळावे यासाठी प्रदेश काँग्रेसने आज राज्यभर सर्व जिल्ह्यात पत्रकार परिषदा घेऊन शिंदे फडणवीस सरकारची पोलखोल केली व खारघर घटनेतील सत्य जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
