भाजपाविरोधात लढण्यासाठी जे एकत्र येतील त्यांच्यासह लढू :
भाजपाविरोधात लढण्यासाठी जे एकत्र येतील त्यांच्यासह लढू :
मुंबई, दि. २५ एप्रिल :
राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. लोकशाही, संविधान संपुष्टात आणण्याचे काम सुरु आहे. भाजपाच्या या मनमानी कारभाराविरोधात एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट असून या लढ्यासाठी जे पक्ष बरोबर येतील त्यांना एकत्र घेऊन लढा दिला जाईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, कोणाला काय वाटते आणि कोणाच्या मनात काय आहे, हा आमचा प्रश्न नाही, आम्ही काही पक्षांना बरोबर घेऊन लढत आहोत, त्यांचे विचार वेगवेगळे असू शकतात पण देशातील लोकशाही धोक्यात आलेली आहे, देश विकून देश चालवला जात आहे, शेतकरी, तरुणांना बरबाद केले जात आहे, महागाई, बेरोजगारीने जनता त्रस्त आहे. अशा परिस्थितीत भाजपाच्या विरोधात एकत्रित लढा दिला पाहिजे. आमची भूमिका स्पष्ट आहे, जे पक्ष बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन लोकशाही व संविधान वाचवण्याचा लढा देऊ.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेसचे मोलाचे योगदान आहे, स्वातंत्र्यानंतर ६० वर्षात देशाला महासत्ता बनवले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून वंचित, मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आणि भाजपा मात्र हे सर्व संपुष्टात आणण्याचे काम करत आहे.
