महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील आर्थिक मदत वाढवा..
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील आर्थिक मदत वाढवा..
मुंबई, दि. २० एप्रिल :
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुणांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना ही संजिवनी ठरली आहे. या योजनेंतर्गत रुग्णांच्या अनेक दुर्धर आजारांवर मोफत उपचार करण्यात येतात. मात्र या योजनेच्या दरपत्रकात सन 2012 पासून एकदा ही दरवाढ झालेली नाही. ही योजना आणखी प्रभावीपणे राबवून आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठ्या प्रमाणात लाभ देण्यासाठी या योजनेतील त्रुटी दूर करुन आर्थिक सहाय्य रक्कमेत वाढ करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या गरीब रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने 2 जुलै, 2012 पासून ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुरु करण्यात आली होती. दि. 1 एप्रिल 2017 पासून सदर योजना ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ या नावाने कार्यान्वित झाली असून या योजनेअंतर्गत अनेक गरजू रुग्ण लाभ घेत आहेत. गरीब व गरजु रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत चांगल्या व दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी या योजनेतील काही त्रुटी दूर करुन आर्थिक सहाय्य रक्कमेमध्ये वाढ केल्यास ही योजना अधिक प्रभावीपणे राबविता येईल.
या योजनेअंतर्गत रुग्णांना उपचार देताना प्रतिदिन प्रति बेड लागणारा खर्च, विविध तपासण्या, औषधांसाठी लागणारा खर्च, तज्ञ आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग यांचेवर होणारा खर्च तसेच प्रतिवर्षी वाढणारी महागाई हे रुग्णांना न परवडणारी आहे. या योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत उपचार देणे बंधनकारक असताना देखील अनेकदा विशेष तपासण्या आणि महाग औषधांसाठी रुग्णालयांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे सन 2012 साली सुरु झालेल्या या योजनेच्या दरपत्रकामध्ये 2012 नंतर एकदाही दरवाढ झाली नसल्याने दरांची फेरनिश्चिती करण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
