आरे वसाहतीमधील आदिवासींच्या मागण्यावर तोडगा काढू..
आरे वसाहतीमधील आदिवासींच्या मागण्यावर तोडगा काढू..
मुंबई, दि. १० मार्च :
मुंबई उपनगर जिल्ह्यातील आरे दुग्ध वसाहतीत राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक असून त्यावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन राज्याचे महसूल तथा दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. धरणे आंदोलन करणाऱ्या आदिवासी बांधवांच्या शिष्टमंडळाची त्यांनी भेट घेतली, तेव्हा ते बोलत होते.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या वतीने आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरू आहे. आज त्यांच्या शिष्टमंडळाने महसूल तथा दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यातील २२२ आदिवासी पाड्यांना गावठाण घोषित करणे, पाड्यावर विशेष मोहीम राबवून जातीच्या दाखल्याचे वाटप करावे, आदिवासी शेतकऱ्यांच्या पीक पाण्याच्या नोंदी करणे अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. यावेळी आंदोलनकर्त्या बांधवांनी दिलेल्या विविध मागण्यांच्या निवेदनाचा स्वीकार करून मंत्री विखे पाटील यांनी त्यांना आश्वस्त केले. तसेच आरे दुग्ध वसाहतीमधील शिष्टमंडळ प्रतिनिधींशी संवाद साधून या मागण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
