साखर कारखान्यांनी बायो प्रॉडक्टची निर्मिती करणे काळाची गरज..

0
IMG-20230210-WA0129

साखर कारखान्यांनी बायो प्रॉडक्टची निर्मिती करणे काळाची गरज.

नाशिक, दि.११ फेब्रुवारी :-

साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी तसेच भविष्यातील इंधनाची गरज भागविण्यासाठी बायो प्रॉडक्टची निर्मिती करणे ही काळाची गरज आहे. असे सांगत राज्यात अनेक सहकारी संस्था तोट्यात गेल्या आहे. या संस्था शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुनर्जीवित करू असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मातोरेवाडी, राजाराम नगर ता.दिंडोरी येथे कादवा सहकारी साखर कारखाना, आसवनीसह (डिस्टीलरी) इथेनॉल प्रकल्प उदघाटन शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, कादवा कारखान्याने इथेनॉलचा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तो अतिशय स्तुत्य आहे. कारण बायप्रॉडक्टशिवाय कारखाने तग धरू शकणार नाही. इथेनॉल फक्त पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यासाठीच वापरले जाते असे नाही तर मद्यनिर्मिती, सौंदर्य प्रसाधने, विविध प्रकारची रसायने, द्रावक, संवर्धक, औषध निर्मितीसाठीही वापरतात. सध्या पेट्रोलची वाढती गरज विकसनशील देशांमध्ये आहे. म्हणजेच इथेनॉलची गरज वाढणार आहे. पुढील दहा वर्षांत विकसनशील राष्ट्रांची इथेनॉलची गरज वाढणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी जास्तीत जास्त इथेनॉल निर्मीतीकडे लक्ष दिले तर त्याचा फायदा संस्थेसोबतच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकणार आहे असे त्यांनी सांगितले.

छोट्या छोट्या संस्थांमध्ये भाग घेऊन जबाबदारी सांभाळत तालुक्याच्या विकासासाठी श्रीराम शेटे यांनी मोलाचे योगदान दिले.महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकारी साखर कारखाना म्हणून दिंडोरी तालुक्यातील कादवा कारखान्याची ओळख आहे. कारखान्यात उसापासून इथेनॉल निर्मिती करून देशहित तर साध्य होईलच, परंतु गरीब शेतक-यांच्या घरात दोन पैसे जातील व त्यांचे जीवनमान उंचावेल. शिवाय इथेनॉलमिश्रित पेट्रोलपासून प्रदूषणही होत नाही की जी काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मांजरपाडा प्रकल्प पूर्ण केला आहे. या ठिकाणी गुजरातकडे वाहून जाणारे पाणी अडवून नार पार प्रकल्पाद्वारे हे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविले तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्याची तहान भागुन हा भाग सुजलाम सुफलाम होईल असे त्यांनी सांगितले. तसेच पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हवा बदलत असून राज्यात महाविकास आघाडीकडे जनतेचा कौल असून आपल्या हिताचे सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केली.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *