मुंबई महानगरपालिकेवर दरोडा टाकणारी डाकू म्हणजे शिवसेना!
मुंबई महानगरपालिकेवर दरोडा टाकणारी डाकू म्हणजे शिवसेना!
मुंबई, दि. २४ जानेवारी:
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये त्यांनी केलेलं भाषण म्हणजे आदळाआपट, थयथयाट आणि नृत्य आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी सुरक्षित राहिल्या याचे कारण भारतीय जनता पक्षाने पारदर्शी पद्धतीने चौकीदारी केली, त्यामुळे त्यांना त्याच्यावर दरोडा टाकता आला नाही. गेल्या २५ वर्षातील उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे मूल्यमापन करायचे झाल्यास मुंबई महानगरपालिकेवर दरोडा टाकणारे डाकू म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत,अशी सडकून टीका मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी केली.
आम्ही पारदर्शी पद्धतीने चौकीदारी केली म्हणून या ठेवी राहिल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजीसारखी चालवली. मी, शेठजी यासाठी म्हणतो की त्यांनी कामे केली ती धनदांडग्या शेठजीसाठी…मग कधी ताजला सूट द्या.. बिल्डरांना प्रीमियममध्ये सूट द्या… कधी डिस्कोसारख्या बार मालकांना सूट द्या.. ठेकेदारांना सूट द्या.. काल स्वतः तेच म्हणाले की, ते ठेकेदारांचे पैसे आहेत. ठेकेदारांचे पैसे परत देण्यासाठी शेठजी उद्धव ठाकरे त्या ठिकाणी लक्ष देत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाने टाकलेला दरोडा आणि डाकुपासून मुक्त करणे यासाठी मुंबईकरांबरोबर भारतीय जनता पक्ष आहे. स्वतः उद्धव ठाकरेंच्या पक्षाने केलेला वैचारिक स्वैराचार हा इतिहासात नोंदला जाईल असा आहे. वैचारिक स्वैराचाराचे कृत्य म्हणजे उद्धव ठाकरे यांचे राजकीय जीवन आहे. मला व्यक्तिगत जायचे नव्हते पण त्यांनी आमचे बापजादे काढले त्यामुळे आज मला बोलावे लागत आहे.
एक अपयशी नेता म्हणजे उद्धव ठाकरे..ते स्वतःच्या कुटुंबातील बंधू, चुलत बंधू यांनाही ते एकत्र ठेवू शकले नाहीत.. कौटुंबिक स्तरावर ते अपयशी झाले.. स्वतःच्या पक्ष ते एकत्रित ठेवू शकले नाहीत. गणेश नाईक ते नारायण राणे सगळे त्यांच्यावर आरोप करून बाहेर पडले. स्वतःचा पक्ष, स्वतःचे कुटुंब त्यानंतर सरकार तेही ते एकत्र ठेवू शकले नाहीत.
