करमाळ्यातील रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजना मार्गी लावू.
करमाळ्यातील रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजना मार्गी लावू.
सोलापूर, दि. २६ डिसेंबर :
राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे महत्वपूर्ण योगदान असून, राज्यात 14 लाख 87 हजार हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे. सोलापूर जिल्हा साखर पट्टा असून या भागाचा विकास महत्वाचा आहे. त्या पार्श्वभूमीवर रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजनेबाबत तात्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
करमाळा तालुक्यातील शेलगाव भाळवणी येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २७ व्या ऊस गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते गव्हाण पूजन करून, मोळी टाकून कारखान्याचा 27 वा गळीत हंगाम शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्रत्येक मंत्रीमंडळ बैठकीत रखडलेल्या सिंचन योजनांना सुधारित मान्यता देऊन गती देण्याचा या सरकारने प्रयत्न केला असून त्यातून जवळपास 2.5 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबतही जलसंधारण विभागाची तात्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार काम करत आहे. शेतकरी, कष्टकरी, वारकरी, असंघटित कामगार असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी व्हावा, अशी सरकारची भूमिका आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारे, त्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार असून करमाळा तालुक्यातील विकासाचे प्रकल्प पूर्ण केले जातील, असे त्यांनी सांगितले.
या कारखान्याचे 32 हजार सभासद असून, त्यांची कुटुंबे कारखान्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे सभासदांच्या हितासाठी कारखान्याचे खाजगीकरण होऊ नये, हा कारखाना सहकारी तत्वावरच चालावा, ही भूमिका ठेवून सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्याचप्रमाणे करमाळा तालुक्याच्या विकासासाठी एकत्रित, एक दिलाने काम करा, सरकार पाठीशी राहील, असे सांगून त्यांनी कारखान्याने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
महसूल व आरोग्य विभाग नाविन्यपूर्ण व चांगल्या योजना राबवत असल्याचे कौतुक करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आरोग्य विभागाच्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित योजनेतून महिलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी 4.5 कोटी महिलांची आरोग्य तपासणी होत आहे.
