गणेशोत्सव साधेपणाने साजरा करुया!
सार्वजनिक गणेश मंडळांनी समाजोपयोगी उपक्रम राबवावे.
मुंबई, दि. २१ ऑगस्ट २०२०
कोरोनाच्या संकटामुळे गुढीपाडवा, कृष्ण जन्माष्टमी, दहिहांडी, ईद यासारखे सर्वच सण-उत्सव साधेपणाने, घरात राहूनच आपण साजरे केले आहेत. आता गणेशोत्सवसुद्धा आपल्याला तसाच साधेपणाने, शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करुन तसेच सामाजिक भान ठेवून साजरा करायचा आहे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
थोरात पुढे म्हणाले की, कोरोनाचे संकट अजून संपलेले नाही त्यामुळे आगमन व विसर्जनाच्या मिरवणुकीचा जल्लोष यावर्षी करता येणार नाही. सर्व प्रकारची दक्षता घेऊन अतिशय साधेपणाने हा उत्सव आपल्याला साजरा करावा लागणार आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक गणेश मंडळांनी यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच काही गणेश मंडळांनी रक्तदान, प्लाझ्मादानसारखे उपक्रम राबवण्याचा घेतलेला निर्णयही कौतुकास्पद आहे. इतर मंडळांनीही विविध सामाजिक उपक्रम राबवून कसलीही गर्दी, जल्लोष न करता यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करुन एक आदर्श घालून देऊ.
या उत्सवाचे पावित्र्य राखत घरगुती गणेशोत्सवही त्याच उत्साहात, भक्तीभावाने साजरा करू. गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे, कोरोनाचे हे विघ्न तो पार पाडेल अशी प्रार्थना करुयात असे म्हणून थोरात यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
