शिवाजी महाराजांबद्दल ‘असे’ बोलण्याची कोश्यारींची हिंमत होते तरी कशी?
शिवाजी महाराजांबद्दल ‘असे’ बोलण्याची कोश्यारींची हिंमत होते तरी कशी?
मुंबई, दि. 21 नोव्हेंबर :
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना असे बोलायची हिंमत होते तरी कशी? यापूर्वीही महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरही त्यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. राज्यपाल यांना महाराष्ट्रात राहायचा अधिकार नसून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून जगभरात त्यांचा मोठा नावलौकिक आहे; परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेल्या कोश्यारी यांनी छत्रपतींचा केलेला अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. कोश्यारी यांनी या आधी अनेक वेळा महाराष्ट्रातील नागरिकांचा अपमान केला आहे.
महात्मा फुलेंचा अपमान करण्यापासून ते गुजराती आणि मारवाड्यांनी मुंबई बनवण्यापर्यंत आणि महाराष्ट्रीयांकडे क्षमता नाही, असे सांगण्यापर्यंत अनेकवेळा त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. राज्यपालांनी आपले विधान मागे घेत महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी आणि आपल्या पदाचा त्वरित त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रीती शर्मा मेनन यांनी केली.
