राजीव गांधी यांनी देशाला तंत्र वैज्ञानिक दृष्टी दिलीः प्रा. विवेक सावंत.
देशाच्या जडणघडणीत राजीवजींचे अमुल्य योगदानः निलम गो-हे
अशोक चव्हाण व उल्हास पवार यांनी जागवल्या राजीवजींच्या महाराष्ट्रातील सभांच्या आठवणी…
मुंबई, दि. २० ऑगस्ट २०२०
जुन्या विचारांच्या भारत देशाला राजीव गांधी यांनी तंत्र वैज्ञानीक दृष्टी दिली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महाशक्ती बनवून भारताला स्वाभिमान दिला. पुढच्या पन्नास वर्षाचा अर्थव्यवस्थेचा पाया राजीव गांधी यांनी त्यावेळी रचला होता त्यामुळेच आपण आज इथपर्यंत पोहोचू शकलो असे प्रतिपादन प्रा. विवेक सावंत यांनी केले.
माहिती तंत्रज्ञान युगाचे जनक, आधुनिक भारताचे शिल्पकार, माजी पंतप्रधान भारतरत्न राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून राजीवजी गांधी यांना अभिवादन करण्यासाठी ऑनलाईन अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अभिवादन सभेला माहिती व दूरसंचार तज्ञ विवेक सावंत, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गो-हे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन जोशी उपस्थित होते. प्रा. भाऊसाहेब आजबे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या अभिवादन सभेत बोलताना विवेक सावंत म्हणाले की, राजीव गांधी जेव्हा संगणकाबाबत बोलत होते तेव्हा अनेकजण त्यांच्यावर टीका करत होते. पण संगणक क्रांती आणणार हा ध्यास त्यांनी घेतला होता. राजीव गांधीमुळे सर्वसामान्य घरात संगणक पोहोचला. राजीव गांधी यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे ८ टक्के म्हणजेच १३ लक्ष कोटींचा माहिती तंत्रज्ञान उद्योग उभा राहिला. यातून ५० लाख लोकांना थेट रोजगार मिळतो आहे. माहिती प्रधान सभ्यता, ज्ञानप्रधान सभ्यता, बुद्धीमत्ता प्रधान सभ्यता या तीन क्रांतीची पायाभरणी राजीव गांधी यांनी केली त्याचीच फळे आज भारत देश चाखतो आहे. राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळे भारताचा वेगाने विकास झाला आणि लोकांचे जीवनमान उंचावले.
यावेळी बोलताना विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गो-हे म्हणाल्या की, राजीवजी गांधी यांनी दूरसंचार क्रांतीबरोबरच नवे शैक्षणिक धोरण आणून देशभरात नवोदय विद्यालयाची स्थापना केली. त्याचसोबत पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून महिलांना राजकारणात मोठी संधी दिली. राजीवजींनी घेतलेले हे निर्णय भारताच्या जडणघडणीत आणि विकासात मैलाचा दगड ठरले आहेत.
भारतरत्न राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महाराष्ट्रातील ऐतिहासीक सभांवर ऑनलाईन चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी राजीवजींच्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक सभांच्या आठवणी जागवल्या.
याशिवाय मुंबईतील काँग्रेसचे शतकपूर्ती अधिवेशन ऐतिहासिक क्षण या विषयावर ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे व्याख्यान पार पडले. भावे यांनी या ऐतिहासीक शतकपूर्ती अधिवेशनाच्या आठवणी जागवल्या. या कार्यक्रमाला राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड उपस्थित होते.
तर सायंकाळी राज्यस्तरीय भारतरत्न राजीव गांधी मुक्त काव्यस्पर्धेचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते कऱण्यात आले. या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व गुजरातचे प्रभारी खा. राजीव सातव, ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हासदादा पवार उपस्थित होते.
तत्पूर्वी सकाळी प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कूपरेज मैदान येथील राजीव गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Comment