ठाकरे सरकारच्या काळात किती प्रकल्प आले? निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा.
ठाकरे सरकारच्या काळात किती प्रकल्प आले? निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा.
मुंबई, दि. १ नोव्हेंबर:
अडीच वर्षात राज्यात प्रकल्प यावे म्हणून ठाकरे सरकारने प्रयत्न करून प्रस्ताव आणले असतील तर नेमके किती प्रस्ताव आले? किती कोटींचे आले? कुठल्या कुठल्या टप्प्यावर ते होते. ते प्रत्यक्षात सुरू झाले का? सुरू नाही झाले ? या सगळ्याची निवृत्त मुख्य न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी करा आणि होऊ दे दूध का दूध पानी का पानी..असे आव्हान भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिले आहे.
आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर देत मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी पलटवार केला. ते पुढे म्हणाले की, पेंग्विन सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद ऐकून
पेंग्विनने डोक्याला हात मारला असता. आदित्य ठाकरे तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून पत्रकार परिषद आणि प्रश्नांच्या उत्तराची अपेक्षा धरत आहे, विसरलात का? अडीच वर्ष आपले पिताश्री मुख्यमंत्री होते. त्यांनी ना विधानसभेत एका प्रश्नांच उत्तर दिलं ना विधानसभेच्या बाहेर कधी पत्रकार परिषद घेतली. आपले पिताश्री मुख्यमंत्री असताना वेगळा न्याय आणि दुसरे कोणी मुख्यमंत्री असताना वेगळा न्याय या पद्धतीच्या भूमिकेवर पेंग्विन ने डोक्यावर हात मारला असता.
बल्क ड्रग पार्क या प्रकल्पासाठी दिल्लीत जाणे आवश्यक होते. आदित्य ठाकरे, तुम्ही आणि तुमचे सहकारी सरकार वाचवण्यासाठी सोनिया गांधींना भेटले पण या प्रस्तावासाठी तुम्ही एकही भेट केंद्र सरकारच्या कुठल्याही मंत्र्यांशी किंवा प्रधानमंत्री कार्यालयाशी केलेली दिसलेली नाही. स्वतःचे सरकार वाचवण्यासाठी मात्र पुढे अग्रेसर, मात्र, राज्यातील आपल्या मुलांच्या नोकऱ्यासाठी कदमताल करतायत. या पद्धतीने राज्य अडीच वर्ष चालल्यामुळे आजची राज्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यात राज्याची बदनामी केवढी?
अडीच वर्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते; महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार होते. त्या काळामध्ये जे प्रस्ताव आणि उद्योग गेले म्हणून तुम्ही जो भ्रम आणि खोटे पसरवत आहात ते मुळात आले कधी? याचे एकही डॉक्युमेंट तुम्ही दाखवत नाही. उद्धव ठाकरेंनी चालवलेले सरकार आणि आदित्य ठाकरेंनी मांडलेली भूमिका याचे वर्णन अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र असेच करता येईल. तत्कालीन मुख्यमंत्री कधी कोणाला भेटले, बोलले नाहीत, पत्रकार परिषदा केल्या नाहीत असे शेलार म्हणाले.
