घटनाबाह्य सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही
घटनाबाह्य सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही
मुंबई, दि. 29 ऑक्टोबर:
घटनाबाह्य सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही, हे सरकार अस्थिर आहे. नेत्यांची सिक्युरिटी काढा पण तरुणांना रोजगाराची सिक्युरिटी द्या. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याप्रकरणी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत उद्योग मंत्री आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली.
एका बाजूला शेतकरी संकटात असताना उद्योग जगतात देखील आपल्याला धक्के बसत आहेत. वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्क सारखे मोठे प्रकल्प बाहेर गेले असताना आता टाटा एअरबस सारखा मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. उद्योगमंत्री यांनी एक मुलाखतीत सांगितलं होतं की मिहानसोबत एअरबस प्रकल्प नागपूरला येणार. चुकीची माहिती का दिली? चार मोठे प्रकल्प बाहेर गेलेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उद्योग मंत्री यांचा राजीनामा घेणार का?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
कुठल्याही उद्योजकांना या घटनाबाह्य सरकरवर विश्वास नाही, हे सरकार किती काळ टिकेल. दिल्लीत या सरकारच्या अस्थिरतेबाबत चर्चा सुरू आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. एका माणसाच्या राक्षशी महत्वकांक्षामुळे गद्दारी मुळे महाराष्ट्राच नुकसान होते महाराष्ट्राला फटका बसतोय, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
इतर राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्यात येऊन उद्योग आपल्या राज्यात कसे येतील याबाबत प्रयत्न केले. आपले मुख्यमंत्री मंडळं फिरताहेत. कोणी गद्दारी करत असेल तर त्याला शाल घालताहेत. मी जर यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतो तर राजीनामा दिला असता आणि सरकारमधून बाहेर पडलो असतो आणि निवडणुकीला सामोरे गेलो असतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
