महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकाबरोबरच क्रीडा रसिकांची मने जिंकली
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकाबरोबरच क्रीडा रसिकांची मने जिंकली..
मुंबई, दि. 13 ऑक्टोबर :
गुजरात येथे झालेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 39 सुवर्णपदकांसह 140 पदकांची कमाई करत क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राची मान उंचावली आहे. टीममधील प्रत्येक खेळाडूंनी जिगरबाज खेळ करत पदकांबरोबरच देशातील क्रीडा रसिकांची मने जिंकली आहेत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते तथा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, गुजरातमध्ये आयोजित केलेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 39 सुवर्ण, 38 रौप्य आणि 63 कांस्य अशी एकूण 140 पदके जिंकून पदक तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. महाराष्ट्राच्या टीम मधील प्रत्येक खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या अथक परिश्रमाचे हे फळ आहे. महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.
या यशात महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे पदाधिकारी, राज्याच्या क्रीडा खात्यातील सर्व अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील आजचे यश हे आशियाई क्रीडास्पर्धेसह ऑलिम्पिक सारख्या महत्त्वाच्या स्पर्धांच्या दृष्टीने विजयाची पहिली पायरी ठरेल, असा मला विश्वास आहे. राज्यातील प्रत्येकाला आपल्या खेळाडूंच्या कामगिरीचा अभिमान आहे. या यशासाठी स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि व्यवस्थापकांसह त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या पालकांचे सुध्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
