मुंबईवर गिधाडे घिरट्या घालत आहेत, त्यांना आस्मान दाखवू !

0
sss

मुंबईवर गिधाडे घिरट्या घालत आहेत, त्यांना आस्मान दाखवू !

मुंबई, दि २२ सप्टेंबर :

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून शिवसेना फोडल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा गोरेगावमध्ये पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपा, एकनाथ शिंदे व अमित शाह यांचा समाचार घेतला. हिम्मत असेल तर मुंबई महापालिका निवडणूक व विधानसभेची निवडणूक एक महिन्यात घेऊन दाखवा, असे थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना दिले आहे.

निवडणुका आल्यावर भाजपाला मुंबईची आठवण येते, यांना मुंबई जिंकायची आहे आणि ती स्क्वेअर फुटावर विकायची आहे, त्यामुळे मुंबईवर सध्या गिधाडं घिरट्या घालत आहेत, त्यांना आस्मान दाखवू. आता तुमचे कोणतेही डावपेच यशस्वी होणार नाहीत, आता काहीही करा, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

मुंबई जिंकायची म्हणजे नेमके काय? मुंबई जिंकायची म्हणजे पहिले मुंबईकरांची मने जिंकावी लागतात, ती शिवसेनेने जिंकली आहेत. मुंबईकरांच्या सुखदुखात शिवसेनेने सहभाग घेतला. भाजपला बदल करायचा आहे, मुंबई दिल्लीकरांच्या पायी घालायची आहे. पण ही मुंबई छत्रपती शिवरायांची आहे, ती झुकणार नाही.

मुंबई संकटात असते तेव्हा कुठे असता? जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तुम्ही येता. मुंबई ही तुमच्यासाठी रिअल इस्टेट मधील पर स्क्वेअर फीटप्रमाणे विकायची जमीन आहे. आमच्यासाठी ही मातृभूमी आहे, आमची आई आहे. या आईवर चाल करून येणार्‍याचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही. पंचवीस वर्ष युतीत आमची सडली, कुजली. ही सगळी नालायक माणसं आपण जोपासली. मेहनत करायची शिवसैनिकांनी आमि यांना विनासायास उपमहापौरपद मिळालयचे.

मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र आणि तेथून तुम्ही आर्थिक केंद्रच पळवता? वेदांतावरून धादांत खोटे बोलता? कुणाशी भांडता? मिंधे गट म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा.मिंधे गट नुसता होय महाराजा बोलत आहे. शिवसेना म्हणजे काय, शिवसेनेचे हिंदुत्व कळते का, मराठी-हिंदू सोबत उत्तर भारतीय, गुजराती सर्व आमच्या सोबत आहेत. मुंबईवर लचके तोडणारी गिधाडं, त्यांची औलाद फिरायला लागली आहे. शिवाजी महाराजांच्या काळात देखील आदिल शहा, हे शहा, ते शहा असे अनेक चाल करून आले..आताही त्या कुळातील येऊन गेले. अमित शाह म्हणाले, शिवसेनेला जमीनीवर आणू. तुम्ही प्रयत्न कराच, तुम्हाला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही.

ठाकरे घराणे संपवायचे आहे तर संपवा. माझ्या समोर बसलेला तो ठाकरे परिवार आहे. या प्रत्येकाच्या हृदयात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. मी शांततेच आवाहन करतोय कारण रक्तपात झाला तर तो आपल्यात आणि या गद्दारांमध्ये होईल. कमळाबाईचे कपडे साफ राहतील. त्यांचा तो डाव मला यशस्वी होऊ द्यायचा नाही. गायीच्या आतड्याला लागलेला गोचीड दूध नाही तर रक्त पितात तशा या गोचीड होत्या, गळून गेल्या ते बर झालं. मूठभर निष्ठावंत सोबत असतील तरी मला चालेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *