हवेत असलेल्या भाजपाला शिवसेना आकाश दाखवेल !
हवेत असलेल्या भाजपाला शिवसेना आकाश दाखवेल !
पुणे, दि. 6 सप्टेंबर –
केंद्रातील भाजपाच्या मोठया नेत्याला मुंबईत येऊन मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच भाषण ठोकाव लागतं यातच शिवसेनेचा नैतिक विजय झाला आहे. केंद्रातील नेतृत्वाला मुंबईत निवडणुकीसाठी यावं लागतं म्हणजे राज्यातील स्थानिक नेत्यांमध्ये ती शक्ती करिष्मा नाही का असा प्रश्न उपस्थित करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर खोचक टोला लगावला.
मागील निवडणुकीतही भाजपने अशीच घोषणा केली होती, त्यावेळी मोदींची लाट व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तरी शिवसेनेने विजय प्राप्त केला होता. यावेळी फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत.शिवसैनिकांमध्ये जिद्द व उत्साह पाहायला मिळतोय. निवडणूक नसतानाही शिवसेनेची शक्ती जनतेत पाहायला मिळते, त्यामुळे शिवसेनेचा दैदिप्यमान विजय होईल असा विश्वास दानवे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत बोलताना व्यक्त केला.
भाजप मुंबई आमची सातत्याने म्हणते. मात्र सर्व कंपन्या, व्यापार अहमदाबादला नेतेय. त्यामुळे मुंबईकर व महाराष्ट्रातील जनतेत चीड आहे. येणाऱ्या काळात जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. शिवसेना आजही जमिनीवर आहे. शिवसेनेला जमीन दाखवण्याची गरज नाही. ते हवेत आहेत, त्यांना शिवसेना आकाश दाखवेल असा इशारा देत दानवे यांनी शिवसेनेवर अमित शाह यांच्या टीकेवर पलटवार केला.
अमित शहा म्हणत असतील खऱ्या शिवसेनेसोबत युती केली तर यापूर्वी मातोश्रीवर नतमस्तक होत होते त्याचं काय असा प्रश्न करत दानवे यांनी खरी शिवसेना कोणती आहे हे जनतेला चांगले माहिती आहे, असा टोला लगावला.
शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवतीर्थावरच दसरा मेळावा होतो. एक मैदान, एक नेता व एक झेंडा शिवसेना म्हणते. यंदाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा होईल असे दानवे यांनी ठणकावून सांगितले.
ज्या ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत कोणाची तरी बदनामी केली होती. त्यांना आता भाजपसोबत घेणार काय असा सवाल दानवे यांनी केला. तर शिंदेच्या दसर्ऱ्या मेळाव्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीवर दानवे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा वसा उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवला. त्यामुळे बाकीच्या ठाकरेंच महत्त्व अधोरेखित होत नसल्याचे दानवे म्हणाले.
