मेट्रो तीनसाठी आरे येथील कारशेडच सर्वार्थाने व्यवहार्य ..
मेट्रो तीनसाठी आरे येथील कारशेडच सर्वार्थाने व्यवहार्य ..
मुंबई, दि. 21 ऑगस्ट :
नॅशनल पार्क १२ हजार हेक्टरवर विस्तारलेला आहे. त्यापैकी आरे काॅलनीची जागा १३०० हेक्टर आहे. त्यातल्या ३० हेक्टर जागेवर मेट्रो तीनचे कारशेड होणार असून या जागेच्या तिन्ही बाजूला रस्ते आहेत. मुळात ही जागा डेअरी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनची होती. वनविभागाची नव्हती. परंतु, त्याबाबत सुरवातीपासूनच जाणते – अजाणतेपणी संभ्रम निर्माण केला गेला, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
सामंत म्हणाले, मेट्रो तीन साठी आरे येथील कारशेडच सर्वार्थाने व्यवहार्य असल्याचा तज्ज्ञांचा अहवाल आहे. मुंबईतील १७ लाख प्रवासी या मार्गिकेवर प्रवास करणार आहेत. ही मेट्रो सुरू झाल्यानंतर रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होणार तसेच कोळसा किंवा तत्सम फाॅसिल फ्यूअल त्यासाठी जाळले जाणार नाही. यामुळे, दोन लाख मेट्रीक टन प्रदूषण कमी होणार आहे. ही मेट्रो पर्यावरणपूरकच आहे. कारशेडमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा या मेट्रोमुळे मुंबईतील पर्यावरणाचे संवर्धन करण्यास हातभार लागणार आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडी त्यामुळे दूर होईल. लोकांना सुरक्षित, सुखकर आणि वेगवान प्रवासाचे साधन उपलब्ध होईल. त्यामुळे पर्यावरण प्रेमींना माझे आवाहन आहे की त्यांनी आपला विरोध मागे घेत कारशेडचा मार्ग प्रशस्त करावा. कारशेडचे काम आम्ही अत्यंत संवेदनशीलपणे पूर्ण करू. कारशेड कार्यान्वीत झाल्यानंतरच सभोवतालच्या पर्यावरणावर त्यामुळे कोणताही धोका निर्माण होणार नाही याचीही काळजी युती सरकार घेईल, असे सामंत यांनी सांगितले.
