दुर्गराज रायगडवर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा.
दुर्गराज रायगडवर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा.
रायगड, दि. १५ ऑगस्ट
छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने छत्रपती संभाजीराजे यांनी दुर्गराज रायगडवर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. यावेळी नगारखान्यासमोर ध्वजारोहण करून पोलीस प्रशासन व शेकडो शिवभक्तांसह राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली.

छत्रपती संभाजीराजे म्हणतात की, अगणित वीरांच्या बलिदानातून १९४७ साली आपला देश इंग्रजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला. या क्रांतिकारी लढ्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या लढ्यातून आली होती हे हुतात्मा भगतसिंह यांचे जीवनचरित्र आपल्याला सांगून जाते. ६ जून १६७४ रोजी दुर्गराज रायगडवर सार्वभौम स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षे परचक्रात सापडलेल्या भारतभूमीच्या सुपुत्रांना स्वातंत्र्याचा बाणा शिकविला.

स्वराज्य व स्वातंत्र्याचे मूर्तीमंत शक्तिस्थळ असलेल्या दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने व शिवभक्तांच्या साथीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणे, ही अत्यंत गौरवाची व अभिमानाची बाब आहे, अशा भावना छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केल्या आहेत.
