मुंबईच्या डबेवाल्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवू..
मुंबईच्या डबेवाल्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवू..
मुंबई, दि ११ ऑगस्ट :
मुंबईतील डबेवाल्यांचे सर्व प्रश्न आणि मागण्या तातडीने पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी दिली. ‘हर घर तिरंगा’ या अभियानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा म्हणाले, मुंबईत नैसर्गिक आपत्ती, दहशतवादी हल्ले, कोरोना अशी अनेक संकटे आली तरी डबेवाले या संकटाना नेटाने सामोरे गेले आहेत. त्यामुळे डबेवाल्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला अधिक प्राधान्य देवू. लोढा यांनी मालाड मालवणी परिसरातील महिलांसमवेत रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहाने साजरा केला. मोठ्या संख्येने उपस्थित राहत महिलांनी राखी बांधून मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे औक्षण केले. सुमारे चारशेहून अधिक महिलांनी मंत्री लोढा यांना राखी बांधली.
मंगलप्रभात लोढा यांना राखी बांधण्यासाठी सकाळ पासून मोठ्या संख्येने महिलांनी गर्दी केली होती. हा भावनिक क्षण अनुभवण्यासाठी अनेकजण कुटुंबासहित उपस्थित होते. यावेळी मायेची भेट म्हणून महिलांना ओवाळणी देण्यात आली. मालवणी येथील शेकडो परिवारांना धर्मांधांच्या दहशतीमुळे परिसर सोडावा लागला होता. याविरोधात वेळोवेळी आवाज उठवत मंगलप्रभात लोढा यांनी स्थानिकांना न्याय देण्यासाठी लढा दिला आहे.
