RSS ने ५२ वर्षांपर्यंत तिरंगा का फडकवला नाही?
RSS ने ५२ वर्षांपर्यंत तिरंगा का फडकवला नाही?
नवी दिल्ली, दि. ४ ऑगस्ट:
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ हे अभियान केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सुरु करण्यात आले आहे. पण ज्यांच्या मातृसंस्थेने स्वातंत्र्यानंतर ५२ वर्षापर्यंत त्यांच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवला नाही, त्याच संघटनेतून पुढे आलेले लोक आता तिरंग्याबद्दल बोलत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांन केली आहे.
राहुल गांधी म्हणाले की, देशाचा तिरंगा फडकत राहावा म्हणून लाखो लोकांनी स्वत:चे बलिदान दिले. मात्र हाच तिरंगा स्वीकारण्यास एका संस्थेने नकार दिला. या संघटनेने आपल्या मुख्यालयात स्वातंत्र्यानंतर ५२ वर्षांपर्यंत तिरंगा फडकवला नाही. ज्या संघटनेने तिरंग्याचा अपमान केला, त्या संघटनेतून आलेलेच आता तिरंग्याच्या इतिहासाबद्दल सांगत आहेत. हर घर तिरंगा मोहीम राबवत आहेत. आरएसएसने ५२ वर्षापर्यंत तिरंगा का फडकवला नाही असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधींच्या टीकेला उत्तर देताना प्रल्हाद जोशी म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टिप्पणीला गंभीरतेने घेण्याची गरज नाही. संघ तसेच संघाच्या विचारधारेला पूर्ण देशाने स्वीकारलेले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याचा पोकळ दावा करणाऱ्या काँग्रेसची स्थिती आज कशी आहे, हे सर्वांनाच माहिती आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तिरंगा झेंडा अशुभ आहे म्हणत त्याला विरोध केला व ५२ वर्ष त्यांनी त्यांच्या कार्यालयावर तिरंगा फडवला नाही. यावरून राहुल गांधी यांनी आरएसएस वर सवाल उपस्थित केला आहे.
