माजी मंत्री उदय सामंतांच्या गाडीवर पुण्यात हल्ला
माजी मंत्री उदय सामंतांच्या गाडीवर पुण्यात हल्ला.
पुणे, दि. 3 ऑगस्ट:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला करण्यात आला. सामंतांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यात त्यांच्या गाडीचे मागचे काच पूर्णपणे फुटले आहेत. घटनेच्या वेळी प्रचंड मोठा राडा झाला. याच हल्ल्याचा थरार उदय सामंत यांनी सांगितला.
उदय सामंत म्हणाले, “माझी गाडी सिग्नलला थांबली होती. सिग्नलला थांबल्यामुळे मी कुठेही घाई न करता थांबलेलो होतो. माझ्या बाजूला दोन गाड्या येवून थांबल्या. त्या गाड्यांमधून दोन पांढरे शर्ट घातलेले युवक उतरले. एकाच्या हातात बेस वॉलची स्टिक होती. तर दुसऱ्याच्या हातात दगड बांधलेला होता. मला ते येवून समोरुन शिव्या घालत होते. तर दुसऱ्या बाजूला ५० ते ६० लोकांचा मॉब होता”.
माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता. कारण माझ्यावर चालून आलेल्या लोकांच्या हातात बेसबॉल स्टीक होत्या. अनेकांच्या हातात दगड होते. मला जिवानिशी मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कुणीतरी सुपारी देऊन माझ्यावर हल्ला करायला सांगितला”, असा सनसनाटी आरोप शिंदे गटातले आमदार माजी मंत्री उदय सामंत यांनी केला.
आदित्य ठाकरे यांची धनकवडीमध्ये सभा संपन्न झाली. “सभा संपल्यानंतर तिथून बाहेर पडताना काही लोकांच्या हातात हत्यारं होती, दगड होते. मग माझी गाडी समोर आल्यानंतर त्यांनी तीच हत्यारे मला दाखवली. माझ्या गाडीवर दगड भिरकावले. काही लोकांच्या सभेला हत्यारं-दगडं कशासाठी?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी त्यांच्यावरील हल्ल्याला ठाकरे समर्थक शिवसैनिकांना जबाबदार धरलं आहे.
असा भ्याड हल्ला करुन कुणाला वाटत असेल की मी शिंदे साहेबांची साथ सोडेन, आमचे ४५ लोक शिंदे यांची साथ सोडतील, तर या हल्ल्यानं आम्ही होतो त्यापेक्षा जवळ आलो आहोत. असे भ्याड हल्ले करुन उदय सामंत थांबणारा नाही. कुठल्याही प्रसंगाला समोरा जाणारा आहे. कुणावर टीका करत नाही, त्याचा अर्थ मी हतबल नाही. आमच्या सहनशिलतेचा अंत कुणी पाहू नये, असा इशाराच सामंत यांनी हल्लेखोरांना दिला आहे.
