राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्याशी भाजप अजिबात सहमत नाही
राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्याशी भाजप अजिबात सहमत नाही.
ठाणे, दि. ३० जुलै;.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईसंदर्भात केलेल्या वक्तव्याने भारतीय जनता पक्षाची गोची झाली. राज्यपालांच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रीया उमटताच भाजपाने राज्यपालांच्या त्या वक्तव्याशी अजिबात सहमत नाही असे म्हटले आहे. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली.
माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या विधानावर केलेल्या टीकेबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, माफी मागायची असेल तर सुरुवात तुमच्यापासून करावी लागेल. बीएमसीचे सर्व ठेकेदार गेली २५ वर्षे अमराठी होते त्याबद्दल माफी मागणार का? महापालिकेत एकाच गावातील अमराठी कंत्राटदारांना ठेके दिले जात आहेत. महापालिकेत शिवसेनेची २५ वर्षे सत्ता असताना सर्व कंत्राटे अमराठी कंत्राटदारांना कशी दिली? याची उत्तरेही शिवसेनेला द्यावी लागतील.
कोल्हापूरी चप्पल मारुन आंदोलन करण्याची एवढीच खुमखुमी आहे तर काँग्रेसच्या मणीशंकर अय्यर यांनी सावरकर यांच्या बाबत जे अभ्रद वक्तव्य केले तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पध्दतीने जोडे मारो आंदोलन केले होते. त्याच काँग्रेसने वारंवार सावरकरांचा अपमान केला तेव्हा मात्र शिवसेना त्याच काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झाली त्याबद्दल काय? तेव्हा तुमचे हात कुठे गेले होते ? उरला प्रश्न माफी मागण्याचा तर हिशेब करायचा झाला तर बराच हिशेब निघेल त्यावेळी शिवसेनेला पळता भुई थोडी होईल.
राज्यपालांनी जे वक्तव्य केले त्याच्यांशी भाजपा सहमत नाही पण खा.सु्प्रिया सुळेंचे सरकार महाराष्ट्रात होते तेव्हा कुठल्या राज्यपालांनी मराठीत अर्थसंकल्प वाचले होते? कोश्यारी सोडून कोणी मराठीत अर्थसंकल्प वाचून दाखवला ? कोणते राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्यांवर चढून जाऊन नतमस्तक झाले होते? त्यामुळे एका वक्तव्यावर लगेच राजकीय पोळी भाजण्याचे काम करु नये. माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांचा आणि मराठी माणूस या विषयाशी संबंध काय ? ते मंत्री होते तेव्हा त्यांच्या दालनाबाहेर अमराठी विकासकांचे जोडे का दिसत होते? सगळ्या अमराठी विकासकांचा गराडा का असायचा?
आव्हाडांनी राज्यपालांची लायकी काढली ते मर्यादेत बसते का नाही हे जनता पाहते आहे. आव्हाड तुम्ही थंड हवेचे ठिकाण कोणाला विकसीत करायला दिले होते? अमराठी ठेकेंदारांना कामं दिली ते कोण सांगणार? असा टोला ही आमदार आशिष शेलार यांनी लगावला.
