नरेंद्र मोदींना ‘या’ प्रश्नाची भीती का वाटते?
दि. १४ ऑगस्ट २०२०
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी आज भाजप कार्यालयासमोर आंदोलन करत, मोदीजी, कहाँ गये वो 20 लाख करोड? हा जाब विचारण्यात आला. मुंबईतील कार्यालयासमोर आंदोलनास जात असताना पोलिसांनी अध्यक्ष सत्यजीत तांबे व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. कहां_गए_वो_२०_लाख_करोड ? या प्रश्नाची भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना भीती का वाटते? असा सवाल सत्यजीत तांबे यांनी विचारला आहे.
मुंबईतील आंदोलनात सत्यजीत तांबे यांच्याबरोबर उपाध्यक्ष ब्रिजकिशोर दत्त, विधी विभागाच्या समन्वयक करीना झेविअर आणि प्रवक्ते आंनद सिंह हेही सहभागी होते.
सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून घेतलेल्या या राज्यव्यापी ‘हटके’ आंदोलनात 10 ते 14 ऑगस्ट या कालावधीत युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवशी गावोगावी, शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना या 20 लाख करोडच्या पॅकेजचा काही लाभ मिळाला की नाही याची माहिती घेतली तसेच लघु, छोटे व मध्यम उद्योग क्षेत्रातील व्यापारी, दुकाने, कारखान्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. मोदींच्या दाव्यांची वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेतले. नोकरदार व बेरोजगार युवकांनाही या पॅकेजबद्दल विचारले पण कोणत्याच घटकाला या पॅकेजमधून काहीही मिळालेले नाही. विविध घटकांशी संवाद साधून युवक काँग्रेसने या पॅकेजची पोलखोल केली. तसेच फोन व पत्राद्वारे सरकारला जाब विचारला. या आंदोलनाला जनतेने उस्फुर्त प्रतिसाद दिला.
10 ऑगस्टपासून 4 दिवस शेतकरी, उद्योजक, बेरोजगार, नोकरदारांशी केलेल्या संवादानंतर आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी युवक काँग्रेसने राज्यातील सर्व भाजपा कार्यालये व खासदारांच्या घरासमोर जाऊन त्यांनाच 20 लाख करोड नक्की कुठे गेले, अशी विचारणा केली.
या आंदोलनावेळी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सोशल डिस्टन्सिंगसह इतर सर्व अटी व नियमांचेही पालन केले.
