गुजरात दंगलीचे पाप झाकण्यासाठीच अहमद पटेलांवर गलिच्छ आरोप !
गुजरात दंगलीचे पाप झाकण्यासाठीच अहमद पटेलांवर गलिच्छ आरोप !
मुंबई, दि. १६ जुलै :
काँग्रेस नेते स्व. अहमद पटेल यांच्यावर भाजपाने केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. २००२ च्या गुजरात दंगलीने नरेंद्र मोदींची डागाळलेली प्रतिमा स्वच्छ करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. गुजरात दंगलीवेळी राजधर्माचे पालन केले नाही म्हणून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही मोदींना तीव्र शब्दात फटकारले होते. गुजरात दंगलीचे हे पाप झाकण्यासाठीच काँग्रेसवर भाजपाकडून गलिच्छ आरोप केले जात आहेत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, गुजरात दंगल हाताळण्यात नरेंद्र मोदी सरकार सक्षम नव्हते व त्या सरकारची तशी इच्छाही नव्हती हे दिसून आले आहे. गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या नरसंहारांने भारताची जगात नाच्चकी झाली. हे पाप नरेंद्र मोदी यांची पाठ सोडत नाही व सोडणार नाही. पण आपली डागाळलेली प्रतिमा सुधारण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात ते विरोधकांना जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहेत. सरकारी यंत्रणाच्या माध्यमातून विरोधकांना छळण्याचा, त्यांना त्रास देण्याच्या मोदी-शहांच्या षडयंत्राने मृत्यू झालेल्या व्यक्तींनाही सोडलेले नाही. मृत्यूनंतरही त्या व्यक्तीवर आरोप करण्याचे भाजपाचे गलिच्छ राजकारण दर्शवते तसेच मयत व्यक्ती या आरोपांचे उत्तर देऊ शकत नाही हे माहित असूनही भाजपाकडून हिन राजकारण केले जात आहे.
ज्या एसआयटीच्या हवाल्याने अहमद पटेल यांच्यावर कपोलकल्पीत आरोप लावले गेले आहेत, ती एसआयटी सरकारची कठपुतळी बाहुली असून सरकारच्या इशाऱ्यावर नाचत आहे. मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट दिल्याबद्दल एका माजी एसआयटी प्रमुखाला दिलेले खास बक्षीस लपून राहिलेले नाही. कोर्टात सुरु असलेल्या प्रकरणातील काही तथ्यहीन, खोटा व तथाकथीत भाग प्रसारमाध्यमांना हाताशी धरून प्रसारीत करण्यात मोदी-शहा जोडीचा हातखंडा आहे. विरोधकांची बदनामी करण्याच्या मोहिमेचा तो एक भाग आहे यापेक्षा अहमद पटेल यांच्यावर केलेल्या आरोपात काहीही तथ्य नसून अशा आरोपांचे काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात खंडन करत आहे, असे पटोले म्हणाले.
गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर जनता प्रचंड नाराज आहे. तथाकथित गुजरात विकास मॉडेलची पोलखोल झाली आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने ‘तरंगता गुजरात’ जगाने पाहिला आहे. केंद्रातही भाजपा सत्तेत असून महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था हाताळण्यात मोदी सरकार सपशेल फेल झाले आहे. भाजपाकडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसची बदनामी करण्याचा हा डाव आहे. परंतु अशा बदानामीला काँग्रेस पक्ष घाबरत नाही व जनतेलाही भाजपाचे कारनामे माहित आहेत, असेही पटोले म्हणाले.
