मेळघाटातील ‘त्या’ व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये
मेळघाटातील ‘त्या’ व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये..
मुंबई, दि ९ जुलै :
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये पाचडोंगरी आणि कोयलारी गावात विहिरीतील दूषित पाणी पिण्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले आहे. दूषित पाणी पिऊन आजारी पडलेल्यांना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाच डोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी प्यायल्याने ५० जणांची प्रकृती बिघडली होती. या सर्वांना डायरिया झाल्याचे निष्पन्न झाले होते. यातील तिघांचा मृत्यू झाला. या घटना कळताच दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून त्याच्याशी संवाद साधला. या सर्वांवर तातडीने उपचार करावेत तसेच गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करावे असेही त्यांनी सांगितले.. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असली तरीही उर्वरित लोकांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना फोनवरून दिली. यावेळी या सर्वांना योग्य उपचार मिळतील तसेच मृतांचा आकडा वाढू नये यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.
