… तेव्हा कोणाचीही दातखीळ उचकटली नव्हती !

0
20220702_112839

… तेव्हा कोणाचीही दातखीळ उचकटली नव्हती !

मुंबई, दि. ८ जुलै :
शिवसेनेत बंडखोरी करून भाजपासोबत शिंदे गटाने सरकार स्थापन केले तरी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंबद्दल वेगळे झालेले आमदार प्रेम व आदर व्यक्त केला जात आहे. हाच धागा पकडत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना खडे बोल सुनावले.

प्रसार माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.. आज जे प्रेम दाखवता ते प्रेम गेली अडीच वर्ष जे लोक, पक्ष या घरावर, कुटुंबीयांवर अश्लाघ्य आणि विकृत भाषेत टीका करत होती, तेव्हा कोणाचीही दातखीळ उचकटली नव्हती. यांच्यापैकी एकानेही त्याला विरोध केला नव्हता. माझ्या मुलांना आयुष्यातून उठवण्यापर्यंत यांचे प्रयत्न चालले होते, मग तुमचे ठाकरे कुटुंबावरील प्रेम खरे आहे का?

ज्या लोकांनी आणि पक्षाने ठाकरे कुटुंबावर विकृत भाषेत टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात. ज्यांनी ही सगळी विकृत भाषा वापरली, अडचणी निर्माण केल्या त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात, गाठीभेटी घेत आहात, त्यांना मिठ्या मारत आहात. मग तुमचे हे प्रेम खरे आहे की तकलादू आहे? अशी सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

इतके दिवस जे गप्प होते ते आता तिथे जाऊन बोलू लागले आहेत. मातोश्रीने सन्मानाने बोलवले आणि भाजपाशी बोलणी केली तर येऊ असे म्हणत आहेत. मी यापूर्वीही त्यांना सूरतेला जाण्यापेक्षा सूरत दाखवून इथेच बोलला असतात तर अधिक बरे झाले असते असे म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *