राज्यपाल महोदय, तातडीने हस्तक्षेप करा व ‘हा’ गैरप्रकार थांबवा !
राज्यपाल महोदय, तातडीने हस्तक्षेप करा व ‘हा’ गैरप्रकार थांबवा !
मुंबई, दि. २६ जून :
राज्यातील राजकीय स्थिती अत्यंत अस्थिरतेची बनली असताना राज्य सरकारतर्फे अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश (जीआर) काढून निर्णयसपाटा राबविला जात आहे. हा जनतेच्या हक्काच्या पैशाचा गैरवापर होत असून महाराष्ट्राच्या व्यापकहिताच्या दृष्टीने हे थांबण्यासाठी राज्यपालांनी तातडीने हस्तक्षेप करावा आणि या प्रकाराला पायबंद घालावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
प्रविण दरेकर पुढे म्हणातात की, शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी झाली असून स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मनिषा जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सुद्धा त्यांनी रिक्त केल्याचे माध्यमांमधून कळले आहे. अशात मविआ सरकारने 160 च्या वर शासन आदेश 48 तासांत जारी करण्यात आले. विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढविणारा आहे. अडीच वर्ष निर्णयशून्य असलेले महाविकास सरकार कोट्यवधी रुपयांना मान्यता देत आहे. त्यामुळे या गंभीर आणि संशयास्पद परिस्थितीत आपण तातडीने लक्ष घालावे, अशी स्थिती आहे. पोलिस दल व अन्य महत्त्वाच्या विभागातील बदल्यांचा सुद्धा घाट घातला जात आहे. आपल्याला विदित आहेच की, यापूर्वी पोलिस दलांत झालेल्या महाभ्रष्टाचारात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनाच जेलमध्ये जावे लागले आहे.
