… तर महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडू !
… तर महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडू !
मुंबई, दि. २३ जून :
शिवसेनेत आतापर्यंतची सर्वात मोठी फूट पडल्याचे चित्र दिसत असून महाविकास आघाडीतून बाहेर पडा व भाजपाबरोबर सरकार स्थापन करा अशी एकनाथ शिंदे गटाची मागणी आहे. एक एक करत जवळपास ३६-३७ आमदार शिंदे गटाकडे गेल्याचे दिसत असतानाच शिवसेनेकडून एक मोठं विधान केलेले आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी जर बंडखोर आमदारांची इच्छा असेल तर त्यांनी २४ तासात महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरे यांच्यासमोर सांगावे त्यांच्या मागणीचा विचार केला जाईल असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले की, आता या क्षणी ते महाराष्ट्राच्या बाहेर आहेत आणि त्यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. मोबाईल, व्हाटसअपवरुन आणि ट्विटरवरुन काही सांगितले जात आहे. शिवसैनिक असल्याचे सागंताय, शिवसेना सोडणार नाही, असे सांगताय… तुमची भूमिका सरकारविषयी आहे असे सांगताय. तुम्ही उद्धव ठाकरेंसमोर या आणि बोला. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबद्दल विचार करु, मात्र आधी मुंबईत या.
एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांमधून दोन आमदार परत आले आहेत. त्यांनी आ पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकार सांगितला या पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते.
एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच्या २१ आमदारांशी चर्चा झाल्याचेही संजय राऊत यांनी दावा केला आहे. तर खासदार संजय राऊत यांच्या विधानावरून महाविकास आघाडीतील वातावरण तापले आहे. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.
