… तर आधी केंद्रातील सरकार पडेल !
महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र.
मुंबई, दि. १२ ऑगस्ट २०२०
अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येवरुन सुरू असलेली चिखलफेक थांबलेली नाही. सुशांतचा मुद्दा करुन महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याची खेळी काही मंडळींनी सुरु केलेली आहे. परंतु अशा प्रकरणांमुळे सरकारे अस्थिर होऊ लागली तर आधी केंद्रातील मोदी सरकार पडेल, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
सुशांतसिंह प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीसच सक्षम आहेत. त्यांनीच हा तपास पुढे नेला पाहिजे आणि तेच नेतील. अशाप्रकारे मुंबई पोलिसांना अस्वस्थ करुन त्यांच्यावर दबाव आणू नये, असेही राऊत म्हणाले.
सुशांत प्रकरणाचे राजकीय भांडवल करुन काही लोक सरकार पडण्याच्या डेडलाइन देत आहेत.त्याला आत्मानंद म्हणतात. महाराष्ट्रापुढे अनेक प्रश्न आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि इतर सहकारी प्रयत्नांची शर्थ करत असून महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करत आहेत. कुणाला सरकार पाडणे किंवा अस्थिर करण्याच्या खेळात इंट्रेस्ट असेल तर त्यांनी जनतेच्या दु:खावर जरूर पोळ्या शेकाव्यात. आम्हाला त्यात इंट्रेस्ट नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. हा महाराष्ट्र आहे त्यामुळे राजस्थानप्रमाणे इथेही कोणतेच ऑपरेशन यशस्वी होणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
