आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही किंवा तलवारही खुपसत नाही

0
images (52)

आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही किंवा तलवारही खुपसत नाही.

मुंबई, दि. १२ मे :

भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडीत दगाफटका झाल्याने काँग्रेस संतप्त झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यावर दोन्ही काँग्रेसमध्ये प्रतिक्रीया येत आहेत. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मात्र नाना पटोले यांचा आरोप खोडून काढला आहे.

नाना पटोले यांचे स्टेटमेंट चुकीचे आहे. ते कुठुन आले आहेत ते सर्वांना माहीत आहे. त्यामुळे भाजपने बोलावं का नाना पटोले यांनी पाठीत खंजीर खुपसला. हेडलाईन बनण्यासाठी ते बोलले असावेत. जबाबदार नेत्याने वक्तव्य करताना वेडेवाकडे परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी असेही अजित पवार यांनी सुनावले.

आमचेही काही पदाधिकारी त्यांनी घेतले आहेत. १५ वर्षे कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनी सरकार चालवले आहे. त्यावेळी कार्यकर्ते घेत होतो. इतर पक्षात जाऊन त्यांची ताकद वाढण्यापेक्षा एकमेकांच्या पक्षात राहतील हे पाहिले पाहिजे. आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही किंवा तलवार खुपसत नाही आणि असे कधीही बोलत नाही असेही अजित पवार म्हणाले.

शरद पवार हे एकटे राष्ट्रवादी चालवतात असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे त्यावर पत्रकारांनी अजित पवार यांना विचारले असता, बहुतेक ठिकाणी तीच परिस्थिती असते. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे चालवत होते. तर भाजपमध्ये नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आला म्हणून भाजपच्या बोलणार्‍या लोकांना संधी मिळाली आणि आम्हाला आमच्या साहेबांमुळे संधी मिळाली. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या लोकांचा करिष्मा आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील बोलले ते खरे आहे. त्यांच्या बोलण्याला माझे अनुमोदन आहे असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *