… याची किंमत लोक केंद्र सरकारकडून योग्यवेळी वसूल करतील !
… याची किंमत लोक केंद्र सरकारकडून योग्यवेळी वसूल करतील !
कोल्हापूर, दि. 10 मे :
केंद्रात भाजपाच्या नरेंद्र मोदींचे सरकार आहे. या सरकारने जनतेला महागाई, बेरोजगारी हटविण्याची आश्वासने दिली होती ती पूर्ण करण्यात त्यांना शंभर टक्के अपयश आले आहे. याची किंमत लोक केंद्र सरकारकडून योग्य वेळी वसूल करतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिला आहे.
केंद्र सरकारचा समाचार घेत शरद पवार म्.आणले की, आज दिवसेंदिवस प्रत्येक गोष्टीच्या किंमती वाढत आहेत. पेट्रोल, डिझेलच्या किमती कुठे जाऊन पोहोचल्या आहेत ? ज्याच्याकडे गाडी आहे त्यालाच त्रास होतोय असं नाही तर स्टीलचे भाव वाढले आहेत. इंधन दर वाढल्याने प्रत्येक गोष्टीचे भाव वाढतात. या सगळ्याची झळ ही सामान्य माणसाला सहन करावी लागते. देशाची सूत्रं ज्यांच्याकडे आहेत ते याकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत. या प्रश्नावर लोकं बंड करणार नाहीत तर चळवळी करतील आणि चळवळी कराव्या लागतील.
राज्यात आतापर्यंत अनेक चळवळी झाल्या. फरक एवढाच जाणवतो की, कोल्हापूर हा जिल्हा चळवळीचे महत्त्वाचे केंद्र असायचे. त्या चळवळी लोकांच्या प्रश्नांसाठी असत. त्या चळवळी हनुमान चालिसा किंवा प्रार्थना अशा गोष्टींसाठी होत नव्हत्या. सामान्य लोकांसमोर असलेले महागाई, बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्था असे सर्व प्रश्न बाजूला राहिले आहेत आणि अयोध्येत काय झाले ? हनुमान चालिसा म्हणणे हे प्रश्न पुढे आले आहेत. याचा अर्थ स्वच्छ आहे ज्यांच्या हातात देशाची सूत्रे आहेत त्या लोकांना मूलभूत प्रश्न सोडवता येत नाहीत. त्यात त्यांना अपयश आलेले आहे. म्हणून यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी या सगळ्या धर्मांध विचाराला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली जात आहे. त्याचे हे परिणाम आहेत असा खोचक टोलाही शरद पवार यांनी लगावला.
