राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, मनसैनिकांची धरपकड सुरु!
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, मनसैनिकांची धरपकड सुरु!
मुंबई, दि. ३ मे :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सभेसाठी दिलेल्या अटी व शर्थींचे पालन झाले नाही आणि नियम मोडले म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राज ठाकरे, राजीव जेवळीकर व सभेच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, सरदेसाई यांनाही नोटीस पाठवल्या आहेत. दुसरीकडे मनेस पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. लाऊडस्पिकरही ताब्यात घेण्यात आले आहेत. राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत बोलताना मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ४ मे चा अल्टिमेटम दिलेला आहे. भोंग काढले गेले नाहीत तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण केले जाईल, असा इशाराही दिला आहे. या पार्श्वभूमीवर ही कारावई केली जात आहे असे समजते.
राज ठाकरे यांच्यावरील कारवाईआधी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी पत्रकार परिषद घेवून कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यास पोलीस सक्षम असल्याचे सांगितले. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी वर्षा निवासस्थानी भेट घेऊन सर्व परिस्थीतीवर चर्चा केली.
