ग्रामीण भागातही स्टार्टअप्स विकसित व्हावीत!
मुंबई, दि. ९ ऑगस्ट
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहात उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सची निवड करण्यात आली असून त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा ही संबंधित शासकीय विभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंतचे कार्यादेश देण्यात येणार आहेत.
अशी स्टार्टअप्स ग्रामीण भागातही विकसित व्हावीत यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येतील. ग्रामीण भागातील तरुणांनीही त्यांच्या विविध कल्पना योग्य व्यासपीठावर घेऊन जाणे गरजेचे आहे, यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. स्टार्टअप वीकच्या संकल्पनेमुळे प्रशासकीय पद्धतीत विशेष बदल घडून येईल. यातील काही कल्पक स्टार्टअप्सना प्रोत्साहन दिले जाईल असे, कौशल्य विकास राज्यमंत्री शंभुराज देसाई म्हणाले.
या सप्ताहात स्टार्टअप्सना त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे सादरीकरण मंत्री, वरिष्ठ शासकीय अधिकारी, गुंतवणूकदार, तज्ज्ञ यांच्या समितीसमोर करण्याची संधी मिळाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सादरीकरण सत्रे ऑनलाईन घेण्यात आली. उद्योग मंत्री सुभाष देसाई, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मालिक, कौशल्य विकास राज्यमंत्री शंभुराज देसाई, गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सहभागी होत मार्गदर्शन केले.
याचबरोबर विविध विभागांचे सचिव वरिष्ठ अधिकारी, स्टार्टअप इंडिया, सोशल अल्फा (टाटा ट्रस्ट), इंडिया एंजेल नेटवर्क, भारत इनोवेशन फंड, ओमिडियार नेटवर्क, आयआयटी मुंबई, सिडबी व्हेंचर कॅपिटल, जिओनेक्स्ट, वाडिया हॉस्पिटल, नीरी, आयएमसी, अग्नि, टाटा मोटर्स इत्यादी संस्थामधून तज्ज्ञ, पर्यवेक्षक उपस्थित होते.
