मुंबई महानगरपालिकेची नालेसफाई आहे की हातसफाई ?
मुंबई महानगरपालिकेची नालेसफाई आहे की हातसफाई ?
मुंबई, दि. ७ एप्रिल ;
भाजपाने रेटा वाढवला म्हणून अखेर नालेसफाईच्या कामांना एप्रिलच्या पहिल्या आठवडयात सुरूवात होते आहे. अद्याप नाल्यात गाळाचे ढिगारे कायम असून सत्ताधारी फरार असे दुर्दैवी चित्र असून मुंबई महानगरपालिकेची ही नालेसफाई आहे की हातसफाई ? असा सवाल भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपाने नालेसफाईच्या कामांच्या पाहणीस सुरूवात केली. आज खार गझदर बांध, साऊथ एव्हेन्यू नाल्यापासून दौ-याला सरुवात करण्यात आली. त्यानंतर नॉर्थ एव्हेन्यू, एस. एन. डी. टी नाला, मोगरा नाला, मेघवाडी नाला, कोलडोंगरी नाला या नाल्यांची पाहणी करण्यात आली.
आशिष म्हणाले, एस.एन.डी.टी नाला सोडला तर अद्याप कुठेही कामाला सुरूवात झालेली नाही. सर्वच ठिकाणी नाल्यात गाळाचे ढिग पडून असून अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत ही कामे पुर्ण करावी लागणार आहेत. प्रशासनाने नालेसफाईच्या कामांचा १३० कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये ९ मार्चलाच आणला पण त्याला मंजूरी न देताच सत्ताधाऱ्यांची मुदत संपली आणि ते फरार झाले. त्यानंतर भाजपाने आवाज उठवल्यावर सदर प्रस्ताव पालिका आयुक्तांनी मंजूर केला. वास्तविक मार्चमध्ये या प्रस्तावाला मंजूरी मिळून मार्चच्या अखेरच्या आठवडयातच कामांना सुरूवात होणे अपेक्षीत होते. आता कामे सुरू होत आहेत, आम्ही त्यावर लक्ष ठेवून राहणार आहोत.
७ एप्रिल उजाडले तरी नाल्यात गाळाचे ढिग कायम आहेत. गतवर्षी पेक्षा ३० कोटी अधिकचे या कामांना देण्यात आले आहेत त्यामुळे ही नालेसफाई आहे की हातसफाई आहे, असा सवालही आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्या माजी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष कुठे आहेत. या कामांवर लक्ष ठेवण्यापासून हे पळ काढत आहेत.
