ती धमकी नाही तर कोल्हापूरकरांना सावध केले !
ती धमकी नाही तर कोल्हापूरकरांना सावध केले !
मुंबई, दि. ५ एप्रिल:
मतदारांच्या बँक खात्यांची माहिती गोळा करून त्या खात्यांमध्ये पैसे पाठविण्याच्या प्रकाराची ईडीकडून चौकशी होऊ शकते, असा इशारा वेळीच देऊन घाबरविण्याच्या ऐवजी सावध केल्यामुळे कोल्हापुरातील नागरिकांनी आपल्याला दुवा दिला, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, एका शिक्षणसंस्थेचे विद्यार्थी शहरातील मतदारांची माहिती गोळा करताना बँक खात्यांचीही माहिती मागत असल्याने आपण या प्रकाराची चौकशी केली. मतदारांच्या बँक खात्यांची माहिती गोळा करून त्या खात्यांमध्ये मतदानाच्या वेळी पेटीएमसारख्या ॲपद्वारे पैसे पाठविण्याचा प्रयत्न असल्याचेही ध्यानात आले. अशा प्रकारे काळा पैसा वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठविणे हे मनी लाँडरिंग असून त्यामुळे संपूर्ण प्रकाराची ईडीकडून चौकशी होऊ शकते, त्यामुळे मतदारांनी सावध रहावे, त्यांची काही चूक नसताना ते चौकशीत अडकू शकतात असे आपण सावध केले.
लोकांनी अजाणतेपणाने बँकेच्या खात्यांची माहिती दिली होती. पण आपण संभाव्य आर्थिक गैरव्यवहाराबाबत सावध वेळीच केल्याबद्दल आपल्याला अनेक नागरिकांनी दुवा दिला. आपला प्रयत्न लोकांना घाबरविण्याचा नव्हे तर सावध करण्याचा होता व ते लोकांना आवडले. आपण मतदारांच्या बँक खात्यांची माहिती गोळा करण्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
