cm 88

मुंबईत जागतिक दर्जाची विकासकामे….

मुंबई, दि. २६ मार्च :

मुंबईने कोविड काळात जे काम केले ते मुंबई मॉडेल म्हणून जगभरात प्रसिद्ध झाले. फिल्ड हॉस्पीटल, जम्बो हॉस्पीटल उभारले. मुंबईतील विकास कामे जागतिक दर्जाची असतील याकडे शासन कटाक्षाने लक्ष देईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, कोविड कालावधीत राज्य शासनाने वैद्यकीय संसाधने, ऑक्सीजनची कमी असतांना हजारो किलोमीटर वरून रिकामे टँकर पाठवून, एअरलिफ्ट करून ऑक्सीजन आणला. यासाठी रात्रंदिवस आपली यंत्रणा कार्यरत होती. स्कॉटलँण्ड येथील वातावरणीय बदल परिषदेत महाराष्ट्राने प्रादेशिक पुरस्कार जिंकला. कोविड काळात ५ रुपयात आणि नंतर मोफत जेवण दिले. गोरगरीबांचे पोट यातून भरले. आजपर्यंत ८ कोटी थाळ्यांचे वितरण शिवभोजन योजनेत केले.

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी ५०० कोटी रुपये दिले आहेत. हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम ७० टक्के झाले आहे.  सागरी किनारी मार्गाचे ५० टक्के काम झाले आहे.

मुंबईसारखे शहर नाही, मला मुंबईचा अभिमान आहे. मुंबई महापालिकेच्या शाळेत आपल्या पाल्‍यांना प्रवेश मिळावा म्हणून रांग लागते. आठ भाषेतून शिक्षण देणारी मुंबई एकमेव महानगरपालिका आहे. विद्यार्थ्यांना टॅब देत आहोत. १५ हजार शौचालयांचे काम केले आहे. ५०० चौ. फुटाच्या घराला मालमत्ता करातून पूर्ण सवलत दिली आहे. निवडक दवाखान्यात बाळासाहेब ठाकरे आरोग्य योजना सुरु केली. काही चाचण्या मोफत तर काही माफक दरात करत आहोत.

सफाई कामगारांच्या घराचा विषय असेल तो शासनाने मार्गी लावला आहे. 2 तारखेला मराठी भाषा भवनाचे भूमीपुजन अतिशय दिमाखाने करत आहोत. बीडीडी चाळीचा प्रश्न मार्गी लावला आहे. डबेवाला भवनाला जागा दिली आहे. वरळी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभे करत आहोत. मुंबईत मेट्रोची कामे सुरु आहेत. मात्र मेट्रो प्रकल्पाच्या किंमतीत वाढ कशी झाली याची चौकशी केली जाईल. सौरउर्जा प्रकल्प उभे करत आहोत. पर्यावरणाच्यादृष्टीने इलेक्ट्रिक बसेस आणत आहोत. पर्यावरणाची हानी होऊ न देता शाश्वत विकासाला शासनाचे प्राधान्य आहे.

धारावीचा पुनर्विकास रखडला आहे. त्यासाठी रेल्वेची 40 एकर जागा केंद्र सरकारकडून हस्तांतरीत होण्याची गरज आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे आहे. बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई उच्च न्यायालय असे नामकरण करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे.

अर्थमंत्री अजित पवार यांनी पंचसुत्रीच्या आधारे जीवनावश्यक गोष्टीला केंद्रीभूत ठेऊन अर्थसंकल्प मांडला. कठीण काळात जे करता येणार आहे त्यावर अप्रतिम अर्थसंकल्प त्यांनी तयार केला आणि मांडला. या अर्थसंकल्पातील सर्व बाबींची अंमलबजावणी केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *