महाराष्ट्रात हिंदू धर्मांतराविरोधात कायद्यात तरतूद करा
महाराष्ट्रात हिंदू धर्मांतराविरोधात कायद्यात तरतूद करा…
मुंबई, दि. १६ मार्च :
महाराष्ट्र सरकारने हिंदूंच्या सक्तीच्या धर्मांतराच्या विरोधात कायद्यात तरतूद करावी, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.
विधानसभेत बोलताना मंगल प्रभात लोढा म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूचे धर्मांतरण करण्यात येत आहे. पण भारतातील काही राज्यांमध्ये म्हणजेच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये हिंदू धर्मांतराच्या विरोधात कायदा बनवण्यात आला आहे. तसाच कायदा महाराष्ट्रामध्ये का बनवण्यात येत नाही? असा प्रश्न मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थित केला.
मंत्री के. सी. पडवी यांनी महाराष्ट्रात असा कोणताही कायदा बनवण्याची गरज नाही. ही संस्कृती आहे आणि आधी आदिवासींचा धर्म काय ते सांगा, मग चर्चा करा असे उत्तर दिले.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, मंत्री के. सी. पडवी तुम्ही विधानसभेत आहात? तुम्ही काय बोलताय? हे तुम्हाला कळतंय का? संविधानामध्ये आदिवासी जमात हिंदू धर्माचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, असे म्हटले गेले आहे. तुम्ही महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आहात. कोणतेही वक्तव्य करण्याआधी विचार करणे गरजेचे आहे.
