मेट्रो प्रकल्पासांठी केंद्र सरकारने सहकार्य करावे
मेट्रो प्रकल्पासांठी केंद्र सरकारने सहकार्य करावे….
पुणे, दि. 7 मार्च:
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी पुण्याच्या जनतेने अडचणी सहन केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट विस्तारीकरणाबरोबरच पिंपरी-चिंचवड ते निगडी कॅरीडोर, स्वारगेट ते कात्रज, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर,
हडपसर ते खराडी आणि खराडी ते स्वारगेट या जोड मार्गिकेचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम चालू आहे. या प्रकल्पांसाठी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, ठाणे, नागपूर टप्पा २ च्या मेट्रो प्रकल्पासाठी केंद्राने सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाले या कार्यक्रमात ते बोलत होते, ते पुढे म्हणाले, पुणे ही रयतेचे राज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेबांची भूमी आहे. जिजाऊ मासाहेबांनी सोन्याचा नांगर चालवून पुण्याच्या पुनर्निर्माणाचा शुभारंभ केला होता. राष्ट्रनिर्मितीचा आणि जनसेवेचा हा वारसा पुढे नेण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा सर्वांनी मिळून पुढे न्यायचा आहे.
मुळा-मुठा नदी सुशोभिकरण आणि जायका प्रकल्प शहरासाठी महत्वाचे आहेत. पुण्यात साबरमती रिव्हर फ्रंटच्या धर्तीवर मुळा-मुठा नदी सुशोभिकरणाचे काम करण्यात येणार आहे. नदी पात्रातील पाण्याचे स्त्रोत आणि जैवविविधतेला धक्का न लावता ही कामे करावी लागतील. पूर नियंत्रण रेषेचा विचारही होईल याकडे विशेष लक्ष देण्यात येईल.
शासनाने पर्यावरण रक्षणासाठी ई-वाहन धोरण स्विकारले आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होऊन पर्यावरण रक्षणाला मदत होईल. सायकलचे शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. या वाहनांच्या किंमती कमी करण्याबाबत विचार व्हावा, असे मतही पवार यांनी व्यक्त केले.
