पर्यटन विकासासाठी सर्वंकष प्रयत्नांनी अर्थचक्राला गती द्या

0
IMG-20220306-WA0058

पर्यटन विकासासाठी सर्वंकष प्रयत्नांनी अर्थचक्राला गती द्या..

नाशिक, दि. 7 मार्च:

नाशिक जिल्हा सर्व प्रकारच्या पर्यटनात आघाडीवरचा जिल्हा आहे. तसेच धार्मिक पर्यटन म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्याने आता साहसी, वैद्यकीय, शैक्षणिक आणि कृषी पर्यटनातही आपली ओळख तयार केली आहे. जिल्ह्यात येणारा एक पर्यटक 80 लोकांना रोजगार उपलब्ध करुन देतो. त्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करून अर्थचक्राला गती द्यावी, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नांदूर मधमेश्वर अभयारण्य येथे आयोजित पक्षी महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, रामसर दर्जा मिळालेले महाराष्ट्रातील नांदूरमधमेश्वर व लोणार हे दोन पर्यटन स्थळे आहेत. जगभरातील प्रदूषणाची हानी पक्ष्याच्या अधिवसाला बसत आहे. त्यामुळे हजारो किलोमीटचा प्रवास करून हे पक्षी नांदूमध्यमेशर येथे येत असून त्यांचे संवर्धन करायला हवे. पक्षांचे संरक्षण करतांना डॉ. सलीम अली यांचा आदर्श घेऊन पक्षांचे सरंक्षण व संवर्धन करावे, असे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

पर्यटन मंत्री असतांना लोणारच्या परिसरात विविध विकासाची कामे करून या सरोवराचे संवर्धन करण्यात आले.नांदूरमधमेश्वर याठिकाणी देखील पर्यटनाच्या विविध सुविधा निर्माण झाल्याने याठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. नांदूमध्यमेशर येथे अजून काही सुविधा आवश्यक असतील तर त्याचा प्रस्ताव पाठविण्यात यावा.शासनामार्फत सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी दिली.

पर्यटनाने माणूस जुन्याचा नवा होतो त्यामुळे आयुष्याचे काही क्षण पर्यटनाला देऊन स्वतःला रिचार्ज करावे.पर्यटनामुळे अर्थचक्राला गती मिळते. त्यामुळे नाशिक मध्ये येणारे पर्यटक जास्त दिवस थांबावे यादृष्टीने पर्यटनाचा विकास करावा. परंतु पर्यटनाचा विकास करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे साथ फार महत्वाची आहे, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

छायाचित्रे स्पर्धेतील बक्षीस वितरणाच्या अनुषंगाने पालकमंत्री म्हणाले की, एक छायाचित्र तुमच्या मनातील अनेक प्रश्नांना उत्तर असते.ते वादळही निर्माण करते आणि मनाला शांतता सुद्धा देते.त्यामुळे छायाचित्राला अधिक महत्व आहे.

कार्यक्रमापूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली. तसेच इकोफ्रेंडली टॅटू आपल्या हातावर काढून घेतले.

वन्यजीव छायाचित्र स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रथम पारितोषिक डॉ. जयंत फुलकर, द्वितीय चारुहास कुलकर्णी, तृतीय ओंकार चव्हाण व उत्तेजनार्थ रोशन पोटे व विशेष पारितोषिक आनंद बोरा यांचा सन्मान करण्यात आला. छायाचित्र स्पर्धेचे परिक्षक ज्येष्ठ छायाचित्रकार शिरीष क्षीरसागर आणि चित्रकला स्पर्धेचे परिक्षक अनिल अभंगे यांचाही सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *